नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बहुतेक सर्वच राज्यांमध्ये कॉंग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना या पराभवाचे चिंतन करण्याची गरज भासू लागली आणि त्यातूनच राजस्थानमध्ये उदयपूर येथे कॉंग्रेस पक्षातर्फे तीन दिवसांचे चिंतन शिबिर पार पडले. साधारण दोन वर्षांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी देशातील विविध बारा राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुकाही पार पाडल्या जाणार आहेत.
या सर्व निवडणुकांमध्ये जर कॉंग्रेसला चांगले यश मिळवायचे असेल तर आतापासूनच गांभीर्याने काम करावे लागेल, असाच संदेश या चिंतन शिबिराच्या निमित्ताने देण्यात आला आहे. शिबिरात निश्चित काय चर्चा झाली आणि कोणते निर्णय झाले याबाबत अधिकृतपणे पक्षातर्फे काही सांगण्यात आले नसले, तरी माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या पाहता कॉंग्रेसने आपला जनसंपर्क कमी पडत असल्याची कबुली या शिबिरामध्ये दिली आहे. या चिंतन शिबिराचा समारोप करताना पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाचा तळागळातील संपर्क कमी झाला असून आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षाला हा जनसंपर्क वाढवावा लागेल, अशा कानपिचक्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्या. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून पक्षाने व्यापक पातळीवर जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.
देशातील सर्वांत जुना आणि मोठा राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडे एकेकाळी कार्यकर्त्यांचे प्रचंड माहोळ होते; पण हा कार्यकर्त्यांचा प्रभाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे, हे पक्षाच्या लक्षात आले ते बरे झाले. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये पक्षाचे जे तुकडे झाले त्यामुळे नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतर त्या पक्षाकडे नवीन कार्यकर्ते आकर्षित झाले आणि मूळ कॉंग्रेसकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी होत गेली. एकीकडे कॉंग्रेसमधून बाहेर पडून ज्यांनी आपले स्वतंत्र पक्ष स्थापन केले त्या ममता बॅनर्जी असोत किंवा शरद पवार असोत त्यांनी स्थापन केलेल्या पक्षांची कामगिरी त्या त्या राज्यांमध्ये चांगली होत आहे आणि ते पक्ष त्या त्या राज्यांमध्ये सत्तेवरही आहेत.
कॉंग्रेस ज्या ठिकाणी स्वबळावर लढत आहेत त्या ठिकाणी कॉंग्रेसला निवडणुकीत विजय मिळत नाही, हे गेल्या काही कालावधीमध्ये दिसून आले आहे. या वास्तवाची जाणीव असतानाही राहुल गांधी यांनी या चिंतन शिबिरामध्ये प्रादेशिक पक्षांबाबत जरा सावध भूमिका घेतली आहे, असेच दिसते. राज्यांमध्ये प्रभावी असलेले प्रादेशिक पक्ष जातीवर आधारित राजकारण करत असून हे प्रादेशिक पक्ष भाजपला लोकसभा निवडणुकीत हरवू शकत नाहीत आणि कॉंग्रेसचे धोरणच भाजपला आव्हान देऊ शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आगामी कालावधीमध्ये कॉंग्रेस स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याचा संदेश देण्याचे काम या चिंतन शिबिराच्या निमित्ताने झाले आहे.
इतर काही ज्येष्ठ नेत्यांनीही कॉंग्रेसने आपली विचारसरणी सोडून कोणा प्रादेशिक पक्षांसोबत विनाकारण युती करू नये आणि आपले महत्त्व कमी करून घेऊ नये, अशी भूमिका घेतल्याचे समजते. कॉंग्रेस पक्ष जेव्हा इतर काही पक्षांसोबत सत्तेत जातो तेव्हा कॉंग्रेस पक्षाला नेहमीच दुय्यम भूमिका घ्यावी लागते, हे कारणही या नेत्यांनी या चिंतन शिबिरामध्ये दिल्याचे समजते. एकीकडे कॉंग्रेसकडून जनसंपर्क वाढवण्याचा निर्णय घेतला जात असतानाच कॉंग्रेस स्वबळावरच आपली निवडणूकविषयक ताकद अजमावणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत या चिंतन शिबिरातून समोर आले आहेत आणि आगामी कालावधीसाठी कॉंग्रेस पक्षाचे तेच नियोजन असावे अशीच लक्षणे दिसत आहेत. एका कुटुंबात एकालाच उमेदवारी किंवा पद देण्याचा निर्णय घेत असतानाच गेले कित्येक वर्षे जिल्हा पातळीवर पदे सांभाळणाऱ्या लोकांना बाजूला करून नव्या युवा नेतृत्वाला ही पदे देण्याचा विषय या चिंतन शिबिरात चर्चेला आला, ते बरे झाले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कॉंग्रेस पक्षातर्फे युवा नेतृत्वाकडे दुर्लक्ष करून विनाकारणच जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांना महत्त्वाची पदे देण्याचा जो सपाटा लावला होता त्याचे चुकीचे परिणाम पक्षाला दिसू लागले आहेत. पक्षात आपल्याला कोणतेच भवितव्य नाही हे लक्षात आल्याने अनेक युवा राजकारणी कॉंग्रेस पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये दाखल झाल्याचे चित्र समोर आहे. या नेत्यांसोबत त्यांचे हजारो कार्यकर्तेही नव्या पक्षांमध्ये सामील होतात, ही बाबही कॉंग्रेस पक्षाच्या लक्षात आली असल्याने आता कॉंग्रेसच्या आगामी नियोजनामध्ये युवा नेत्यांनाही महत्त्व दिले जाऊ शकते. कॉंग्रेस पक्षाचा प्रमुख विरोधक असणारा भाजप ज्या प्रकारे सतत निवडणुकीच्या मूडमध्ये असतो त्याच प्रकारे काम केले तरच भाजपला आव्हान उभे राहू शकते, हे या चिंतन शिबिराच्या निमित्ताने कॉंग्रेसच्या लक्षात आले असावे.
भाजप नेत्यांची संवाद क्षमता आणि त्यासाठी ते करत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर याची दखल चिंतन शिबिरामध्ये राहुल गांधी यांनी घेतली आहे. कॉंग्रेस पक्षातील प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता संवाद आणि तंत्रज्ञान याबाबत गंभीरपणे काम करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. या शिबिराच्या निमित्ताने कॉंग्रेसला वास्तव परिस्थितीची जाणीव झाली असली, तरी गेल्या काळात राबवण्यात आलेली कॉंग्रेसची “कार्यकर्ता नोंदणी’ देश पातळीवर अयशस्वी झाली आहे, याची जाणीवही पक्षाच्या नेत्यांना ठेवावी लागणार आहे. म्हणूनच आगामी कालावधीमध्ये दोन ऑक्टोबरपासून कॉंग्रेसतर्फे जी जनसंपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे आणि इतर काही नियोजन अमलात आणण्यात येणार आहे ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
एकीकडे कॉंग्रेसचे चिंतन शिबिर सुरू असतानाच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होत आहेत, हेही कॉंग्रेसला लक्षात घ्यावे लागेल. देशात पूर्वीपासूनच कॉंग्रेस आघाडी आणि भाजप आघाडी या दोन समोरासमोरील आघाड्या कार्यरत होत्या. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाएवढाच प्रभावी असेल, तर देशाचा गाडा व्यवस्थित चालतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. साहजिकच आगामी कालावधीमध्ये एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतच कॉंग्रेसला पुन्हा एकदा सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा विचार करावा लागणार आहे. या शिबिरात झालेल्या निर्णयाचे नियोजन आगामी कालावधीमध्ये काटेकोरपणे आणि गांभीर्याने झाले तर निवडणुकीत चांगले यश मिळवून पुन्हा एकदा अशा प्रकारचे चिंतन शिबिर घेण्याची वेळ कॉंग्रेस पक्षावर येणार नाही.