नवी दिल्ली – सरकारने बऱ्याच उपाययोजना करूनही खाद्यतेल आणखी पुरेसे स्वस्त झाले नाही. यासाठी केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात बरीच घट केली आहे.
सरकारने आज जारी केलेल्या माहितीनुसार सूर्यफुलाचे तेल आणि कच्चा सोया तेलावरील आयात शुल्क कमी करून ते आता साडेसात टक्के करण्यात आले आहे. मात्र हा निर्णय मर्यादित कालावधीसाठी लागू करण्यात आला असून या निर्णयाची अंमलबजावणी 30 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे.
आगामी काळात भारतामध्ये बरेच सण येणार आहेत. त्यामुळे खाद्य तेलाची मागणी वाढणार आहे. यावेळी खाद्यतेल स्वस्त व्हावे याकरिता मर्यादित काळासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे.
भारतात गरजेपेक्षा कमी खाद्य तेलाचे उत्पादन होते. त्यामुळे खाद्य तेलाचे उत्पादन वाढावे यासाठी भारत सरकार बरेच प्रयत्न करीत आहे. आगामी काळातही खाद्यतेलाचे उत्पादन वाढावे यासाठी उपाययोजना सरकारने केल्या आहेत.