Edappadi K. Palaniswami : तमिळनाडूतील सत्तेत परतण्याचे स्वप्न भंगलेल्या अण्णाद्रमुकमधील संघर्ष आणखी विकोपाला गेला आहे. बंडखोरांच्या गटाने थेट पक्षप्रमुख ई.के.पलानीस्वामी (Edappadi K. Palaniswami) आणि त्यांच्या समर्थकांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. तर, बंडखोरांचा गट मंत्रिपदांच्या आमिषाचा बळी ठरल्याचा पलटवार पलानीस्वामी यांनी केला आहे. तमिळनाडू विधानसभेत बुधवारी मुख्यमंत्री विजय यांचे सरकार शक्तिपरीक्षेला सामोरे गेले. त्यावेळी अण्णाद्रमुकमध्ये फूट पडल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले. त्या पक्षातील बंडखोरांच्या (Edappadi K. Palaniswami) गटातील २५ आमदार पाठिशी उभे राहिल्याने विजय यांच्या सरकारने आरामात बहुमत सिद्ध केले. त्या घडामोडीमुळे अण्णाद्रमुकमधील दुही स्पष्ट झाली. आता बंडखोर गट विरूद्ध पलानीस्वामी गट (Edappadi K. Palaniswami) असा संघर्ष आणखीच चिघळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तमिळनाडूत एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या अण्णाद्रमुकला यावेळी केवळ ४७ जागा जिंकता आल्या. त्या नामुष्कीनंतर पक्षातील बेबनाव चव्हाट्यावर आला. विधानसभेतील सरकारच्या शक्तिपरीक्षेनंतर अण्णाद्रमुकच्या दोन गटांमधील दरी आणखीच वाढली. Edappadi K. Palaniswami पलानीस्वामी यांनी बंडखोरांची पक्षातील विविध पदांवरून हकालपट्टी केली. त्यानंतर बंडखोर गटाने आणखीच आक्रमक पवित्रा स्वीकारला. आमच्याकडे अधिक आमदार आहेत. त्यामुळे आमच्या गटाने सरकारच्या बाजूने मतदान करण्याविषयी पक्षादेश जारी केला होता. मात्र, त्या पक्षादेशाचे उल्लंघन पलानीस्वामी यांच्यासह २२ आमदारांनी केले. त्यामुळे त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जावे, अशी भूमिका बंडखोर गटाने घेतली. एवढेच नव्हे तर, विधानसभेच्या सभापतींची भेट घेतली. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत पलानीस्वामी आणि त्यांच्या समर्थकांना अपात्र ठरवण्यात यावे, असे साकडे बंडखोर गटाने सभापतींना घातले. दुसरीकडे, पलानीस्वामी समर्थकांनीही बंडखोरांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी सभापतींकडे धाव घेतली. त्यामुळे अण्णाद्रमुकमधील संघर्षाचा चेंडू सभापतींच्या कोर्टात पोहचला आहे.