Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सातव्यांदा ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. त्यांना सोमवारी 26 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी ईडीने केजरीवाल यांना 6 समन्स पाठवले आहेत.
मागील वेळेस मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. ‘आप’ने ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. त्यामुळं आता ईडीच्या समन्सच्या वैधतेचा मुद्दा न्यायालयात आहे, असे आपने म्हटले आहे. ईडीने न्यायालयात धाव घेतलीय. पुन्हा पुन्हा समन्स पाठवण्याऐवजी ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी.
याप्रकरणी ईडीने ‘दिल्लीचे मुख्यमंत्री समन्सकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आणि काढत आहेत. त्यांच्यासारख्या उच्चपदस्थ लोकप्रतिनिधीने कायदा मोडल्यास सर्वसामान्यांसमोर चुकीचा आदर्श निर्माण होईल,’ असे तक्रारीत म्हटले होते.
दिल्लीच्या अबकारी धोरणात घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. त्याच वेळी, ईडी या प्रकरणाचा मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टितिकोनातून तपास करत आहे. केंद्रीय एजन्सींनी या प्रकरणी आतापर्यंत आपचे दोन मोठे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. यानंतर आज 22 फेब्रुवारी रोजी ईडीकडून केजरीवाल यांना पुन्हा समन्स जारी करण्यात आले आहे.