ED Raid Ratnagiri : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे उद्योजक सचिन पाकळे यांच्या कात उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर आज (गुरुवारी) सकाळी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अचानक धाड टाकल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण-सावर्डे येथे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी मोठ्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने कारखान्यातील सर्व कागदपत्रे, झालेले व्यवहार आणि महत्त्वाच्या आर्थिक नोंदींची कसून तपासणी सुरू केली आहे. संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सचिन पाकळे यांची रत्नागिरी जिल्ह्यात नामवंत उद्योजक म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे, त्यांचे राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि आमदार शेखर निकम यांच्याशी निकटचे संबंध आहेत. त्यांच्या या राजकीय वावरामुळेच ईडीच्या या धाडीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. धाडीचे कारण गुलदस्त्यात – ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणात ही धाड टाकली आहे, कारखान्यात नेमका कोणता आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, यासंबंधीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र, उद्योजकांच्या कारखान्यावर थेट ईडीकडून कारवाई झाल्यामुळे परिसरात आणि संपूर्ण जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. या धाडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.