बुध -कृषी क्षेत्रात हंगामी पिकामधून खात्रीशीर उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेती पिकाबरोबर पूरक असे यशस्वी फळबाग लागवडीतून हमखास उत्पन्न मिळविल्यास स्वत:चा अर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते, असे प्रतिपादन कृषी सहाय्यक संतोष शिंदे यांनी केले. चिंचणी (ता. खटाव) येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम पूर्वनियोजनानुसार कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी खरीप हंगामासाठी असणारी सोयाबीन, घेवडा, वाटाणा या पिकांच्या बियाणे उगवण क्षमता चाचणी, बांधावरील व पडीक क्षेत्रावरील फळबाग लागवड, गांडूळ खत निर्मिती, नाडेप कंपोष्ट निर्मिती या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांचे मार्गदर्शनानुसार खरीप हंगाम मोहीम सुरु झाली आहे.
त्यानुसार चिंचणी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संतोष शिंदे म्हणाले, खरीप व रब्बी हंगामातील पिके घेत असताना खात्रीशीर उत्पन्न मिळत नसल्याने त्यासोबत आंबा, सिताफळ, चिंच, डाळींब यासारख्या फळपिकांचे लागवड केल्यास कुटूंबाची फळांची गरज भागून, पूरक उत्पन्नातून आर्थिक नफा खात्रीशीर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा अर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते.
तसेच खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्यापूर्वी बिज उगवण क्षमता चाचणी करणे आवश्यक आहे. याप्रसंगी शिंदे यांनी उपस्थितांना घेवडा सोयाबीन या पिकांची बियाणे उगवण क्षमता चाचणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी गावचे सरपंच सुनील घोरपडे, दिलीप निकम, मधुकर निकम, संजय निकम, दादा निकम, कमलेश निकम आदी उपस्थित होते.