Priyanka Gandhi: मतदार यादीतून विरोधकांचे मतदार हटवण्याचा कट; राहुल गांधींच्या नव्या आरोपाचे प्रियंका गांधींनी केले समर्थन

Priyanka Gandhi: काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग लोकशाहीला आव्हान देत निवडणूक प्रक्रियेचा नाश करत असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि त्यांचे बंधू राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, विरोधी पक्षांना मत देणाऱ्या मतदारांना यादीतून हटवण्याचा सुनियोजित प्रयत्न सुरू आहे. प्रियंका गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांनी लक्ष द्यावे, ज्यामध्ये त्यांनी या दाव्यांचा तपशील सांगितला आहे.
“सर्वांनी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पाहावी, कारण देशात काय सुरू आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेचा नाश करत असून लोकशाहीला आव्हान देत आहे. आपल्याला लोकशाही, संविधान आणि देशासाठी लढावे लागेल,” असे प्रियंका गांधी यांनी वायनाडमध्ये पत्रकारांना सांगितले.
कर्नाटकातही निवडणूक आयोगावर टीका –
दरम्यान, बंगळुरूमध्ये कर्नाटकचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली. ते म्हणाले, “निवडणूक आयोग स्वायत्त संस्था राहिलेली नाही. केंद्र सरकार त्यावर नियंत्रण ठेवत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाला निर्देश दिले, पण ते ऐकत नाहीत. ही आहे भारतातील लोकशाही!”
राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल –
राहुल गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अलंद विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत गैरप्रकार झाल्याच्या तपासात निवडणूक आयोग सहकार्य करत नसल्याचा दावा त्यांनी केला. कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) हा तपास सुरू केला असून, गेल्या दोन वर्षांपासून आयोगाने सीआयडीच्या पत्रांना उत्तर दिलेले नाही. यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे “मत चोरांचे रक्षण” करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.“
फेब्रुवारी २०२३ मध्ये तपास सुरू झाला. मार्च २०२३ मध्ये कर्नाटक सीआयडीने निवडणूक आयोगाला सर्व माहिती मागितली. ऑगस्टमध्ये अपुरी माहिती देण्यात आली, ज्यावरून तपास पुढे जाऊ शकत नाही. जे गरजेचे नव्हते ते दिले, जे गरजेचे होते ते दिले नाही,” असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यांनी निवडणूक आयोगाला एका आठवड्याच्या आत मागितलेली माहिती देण्याची मागणी केली आहे. कर्नाटक निवडणूक आयोगानेही ही माहिती मागितली होती, पण त्याला उत्तर मिळाले नाही.
वंचित समाजाच्या मतदारांना टार्गेट?
राहुल गांधी यांनी असा दावा केला की, देशभरात निवडणुकीनंतर निवडणुकीत काही व्यक्ती किंवा गट विशिष्टपणे विरोधी पक्षांना मत देणाऱ्या दलित, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाच्या मतदारांना यादीतून हटवत आहेत. “आम्ही याबाबत अनेकदा ऐकले होते, पण आता याचा १०० टक्के पुरावा मिळाला आहे,” असे ते म्हणाले. अलंद मतदारसंघात अज्ञात व्यक्तींनी सॉफ्टवेअर आणि कर्नाटकाबाहेरील मोबाइल क्रमांकांचा वापर करून सुमारे ६ हजार मतदारांच्या नावांना यादीतून हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकशाहीसाठी लढण्याचे आवाहन –
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जनतेने लढा द्यावा, असे आवाहन केले आहे.





