कोणाची ते आठवत नाही; पण कविता फार सुंदर आहे.
सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे
जे सुदूर, जे साध्य तेथे मन धावे!
खरंच! विचार करण्याजोग्या ओळी आहेत या असं मला वाटतं. कितीतरी गोष्टी आपण जन्माला येतानाच घेऊन आलो आहोत. मेंदू, डोळे, नाक, कान, हात, पाय, नातेवाईक, स्वभाव आणि नशीब! खरं तर या गोष्टी किती ते मोजताच येणार नाहीत. आपण त्याकडे लक्षच जात नाही आपलं हवा प्रदूषित झाली तरच समजते. (पण शुद्ध हवाच मिळते तोवर), दिवसभर सूर्य प्रकाश देतच असतो, पाणी मिळतच असतं (भले शहरात पाणी कपात असेल), झाडं ऑक्सिजन सोडतच राहतात. शेकडो हजारोजण आपापल्या कामात गर्क असतात म्हणूनच आपण रोज वृत्तपत्र वाचतो, टीव्ही बघतो, टीका करत खातो (विशेषतः घरात) आपण कितीजण यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात याचा विचारच करत नाही.
कोणतीच गोष्ट सहजासहजी आपल्याला मिळकत नाही. अगदी पैसा नाही तरी वेळ तरी द्यावाच लागतो. वेळ अगदी सहज मिळतो. रोज नोकरी करण्याचे तास सोडले तरीही अनेक तास उरतात. विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार व्यक्तींना तर तोही प्रश्न नसतो.
वरच्या पदावरचे, राजकारणी, आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा पडद्यावर दिसणारे नटनट्या सामान्य माणसांना सहज दिसत नाहीत, भेटत नाहीत. तेव्हाच त्यांची खरी किंमत समजते. अगदी रोजच्या व्यवहारातही हे दिसतं. रोज, घरात दिसणारे चेहरे, ऑफिसातले लोक नकोसे वाटू लागतात. मग सहज निसर्गात जाण्याची शांततेत रमण्याची ओढ वाटू लागते.
रोज भेटणारा किंवा दिसणारा माणूसही कमी वाटतो. एखाद्याकडे जाऊन जाऊन किंमत आपणच कमी करून घेतो. सतत जाण्यानं दुर्लक्ष होतं हे आपण लक्षातच घेत नाही. जसं मल्य पर्वतावरची भिल्ल स्त्री चंदनाच्या वृक्षाचा उपयोग सरपण म्हणून चुलीत घालण्यासाठी करते असा संस्कृत श्लोक आहे. सहजपणा आपल्या आयुष्यातूनच नाहीसा होत चाललाय म्हणून आपण कट्ट्यावर जमून चहा पीत मित्रांशी चेष्टामस्करी करत गप्पा मारण्यापेक्षा व्हॉट्सऍप आणि फेसबुकवर मित्रमैत्रिणींना भेटतो, हसऱ्या प्रसन्न चेहऱ्यानं सणसमारंभात लग्नात जाताना कारण नसताना चेहरे रंगवतो (मेकप करतो) साधे स्वच्छ कपड्यांपेक्षा ट्रेंडी, चित्रविचित्र- नक्षीदार कपड्यांना प्राधान्य देतो.
सध्या तर नेल आर्ट नावाचा काही प्रकार निघालाय. बायका एकाच हाताच्या पाच नखांवर पाच वेगळे रंग लावतात. सोनेरी, लाल, हिरवे असे तऱ्हेतऱ्हेचे रंग केसांना लावतात, निसर्गानं दिलेल्या नितळ त्वचेवर हिरवट, काळ्या- लाल रंगाचे टॅटू काढतात. एवढं रंगरोपण करून करायचं काय? जायचं कुठं आणि दाखवायचं तरी कोणाला? असे खूप प्रश्न मला सतावतात. पण अनेकदा- खरं तर प्रत्येकवेळा त्याची उत्तरं मिळत नाहीत.
माझी एक जुनी आठवण सहजच वर आली. माझा एक मित्र कोणत्यातरी झाडाखाली दोन्ही हात डोक्याखाली घेऊन आरामात पडला होता. मी त्याला विचारलं तर तो म्हणाला, “त्यात काय? कपडे मळले तर मळले. मी कपड्यांसाठी नाही तर कपडे माझ्यासाठी आहेत. मी असाच मजेत आहे. अगदी हेच उत्तर डायोजिनीन नावाच्या फकिरानं सिकंदराला दिले होतं. तो नदीकाठी सूर्याच्या उन्हात नग्नावस्थेत पडला होता. सिकंदर म्हणाला, “तुम्हाला काय आणू?’ डायोजिनीन म्हणाला, “काही नको फक्त बाजूला हो. सूर्याचं उन्ह अंगावर येऊ दे आणि तू आता काय करणार?’
सिकंदर म्हणाला, “जगभर जाणार- सगळे देश जिंकणार’ “मग पुढं?’ फकिरानं विचारलं. यावर मात्र सिकंदर गप्पच झाला. कारण जिंकायला तर एकच जग आहे ना? फकीर म्हणाला, “या गप्प बसण्यातच उत्तर आहे. त्यापेक्षा आताच इथं पडून आरामात राहा.’ पण तरीही सिकंदर गेलाच. आणि त्यावेळी माहीत असलेले सगळं जगही तो जिंकू शकला नाही. आपल्या देशात परत येतानाच मरण पावला. अर्थात प्रयत्न करण्यात काही चूक नाही. पण सहज राहणं आपल्या स्वभावाप्रमाणे वागणं हे त्याहून जास्त मोठं आहे. सहज असणारा, वागणारा, बोलणारा माणूस कोणातही चटकन मिसळतो, आपलासा वाटतो. सहजपणाची कमालच काही और आहे जी विशिष्ट होण्यात नाही. हे आपलं लिहिलं सहजच- सुचलं म्हणून!
सहजानंद