मांजरी – मांजरी बुद्रुक रेल्वे गेट क्रमांक तीनवरील उड्डाणपूल तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सर्विस रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचे डबल इंजिन सरकार असल्याने गतिमान विकास होतो आहे.
असे सांगून अधिक बोलताना मंत्री चव्हाण म्हणाले की मांजरी बुद्रुक येथील हा उड्डाणपूल व रस्त्यावरून प्रवास करणा-या प्रवाश्यांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यादृष्टीने उड्डाणपूल व प्रलंबित असलेल्या सर्विस रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण करा.येथून प्रवास करणा-या प्रवाश्यांना त्रास होऊ नये यादृष्टीने सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यावी अश्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
शुक्रवारी संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मांजरी बुद्रुक येथे रेल्वे उड्डाणपूल व सर्विस रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. व आतापर्यंत केलेल्या कामाविषयी आढावा घेतला. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर,भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, शाखा अभियंता श्रध्दा मोरे,भाजपा शहर सरचिटणीस संदीप लोणकर, उपाध्यक्ष भूषण तुपे,
भाजपा हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप दळवी,महिला अध्यक्षा स्वाती कुरणे, माजी सरपंच शिवराज घुले, माजी सरपंच आण्णा धारवाडरकर, माजी उपसरपंच अमित घुले,नितीन होले, पोपटराव वाडकर, प्रमोद सातव, गणेश घुले,प्रमोद कोद्रे ,समीर घुले ,,सुमित घुले,शैलेंद्र बेल्हेकर आदिंसह भाजपचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
1) थोडा उशीर लागला तरी चालेल पण काम नियमानुसार करावे- माजी आमदार योगेश टिळेकर
योगेश टिळेकर म्हणाले ,की उड्डाणपूलाच्या कामात तांत्रिक अडचणी आहेत.त्या जाणून घेण्यासाठी मंत्र्यांना विनंती केली होती, त्यानुसार ते आले. मी आमदार झाल्यानंतर सन २०१५ च्या बजेटमध्ये मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाणपूलासाठी २५ कोटी रुपये मंजूर केले. त्यानंतर लक्षात आले, की पूल चार पदरी केला पाहिजे म्हणून पुढील बजेटमध्ये आणखी २५ कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आणि एकूण ५० कोटींचा निधी उपलब्ध करून या पुलाचे काम सन २०१६ मध्ये सुरू केले.
१७ मीटर रुंदीचा पूल आणि ६ मीटरचा सर्विस रस्ता करण्याचे काम गतीने सुरू होते.दरम्यान रेल्वे गेट बंद करून काम करू दिले असते तर सन २०१९ मध्येच उड्डाणपूल पूर्ण झाला असता. परंतु त्यावेळी विरोधकांनी गेट बंद करू दिले नाही.पुढे २०१९ नंतर काम वेळोवेळी रखडले गेले.वाढीव कामासाठी आवश्यक भूसंपादन २०२१ पासून केले गेले नाही. तसा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न झाला नाही.आमचे लोक स्वतः हून जागा द्यायला तयार आहेत. तर विरोधकांचे लोक अतिक्रमण करून बसले आहेत.
काहींनी उड्डाणपूल सुरू व्हावा म्हणून आंदोलन केले. त्यावेळी तांत्रिक बाबी लक्षात न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय निर्णय घेतला आणि काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. जे शक्य नाही ते कसे काय केले? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.उड्डाणपूल १७ मिटरचाच झाला पाहिजे. तो दहा मीटरवर उतरवू नये.त्यात असणाऱ्या जमिनी योग्य मोबदला देवून संपादित कराव्यात.काम करून उरलेल्या निधीतून पुलावर लाईटची व्यवस्था करावी तसेच पुलाखालील मोकळ्या जागेत सुशोभीकरण करावे.
2) मांजरी बुद्रुक रेल्वे गेटवर सन २००४ उड्डाणपूलाची मागणी होती तेव्हा ९१ गुंठे जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते.
सन २०१५ मध्ये तत्कालीन आमदार योगेश टिळेकर यांनी २५ कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता.तो दोन पदरी उड्डाणपूल होता. पुढे हा चार पदरी उड्डाणपूल करण्यासाठी आणखी २५ कोटी असे ५० कोटींचा निधी मंजूर करून २०१६ मध्ये उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यात आले.
त्यामुळे प्रत्यक्षात काम होताना पुलाची उंची आणि लांबी वाढली त्यासाठी चे भूसंपादन राहिले आहे. १२ नागरिकांची २१ गुंठे जमीन संपादीत करण्याचे काम सुरू आहे.जिल्हाधिकारी यांनीही दखल घेऊन खासगी वाटाघाटीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही अतिक्रमण आहे ते आठ दिवसात काढून आवश्यक ती जागा मोकळी केली जाईल.भूसंपादनसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
– अतुल चव्हाण (मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे.)