अडचणी सांगत बहुतांशी फेऱ्या रद्द : ठेकेदार मोकाट
पुणे – पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पीएमपीच्या ताफ्यातील वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसच्या नियोजितपैकी अनेक फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावत आहे. यामुळे पीएमपीला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. बसेसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात रद्द होत असताना प्रशासनाने या बसेसच्या ठेकेदारास दंड ठोठावला का नाही? याची माहिती समोर येत नसल्याने पीएमपी प्रशासन ठेकेदारांना अजून किती दिवस पोसणार, असा प्रश्न आहे.
भेकराईनगर आणि निगडी या दोन डेपोंमधून इलेक्ट्रिक बसेसचे संचलन सुुरू आहे. दोन्ही डेपोंमध्ये मिळून शंभरपेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. मात्र, चार्जिंग आणि काही तांत्रिक समस्यांमुळे इलक्ट्रिक बसेस रद्द करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. परिणामी, प्रशासनाला रोज काही फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. यामुळे ई-बसेसला देखील फेऱ्या रद्दचे ग्रहण लागल्याची चर्चा आहे.
दंड गुलदस्त्यात
कुठल्याही कारणास्तव नियोजित फेऱ्या रद्द झाल्यास संबंधित कंपनीला दंड ठोठावण्यात येतो. मात्र, फेऱ्या रद्द केल्यानंतर इलेक्ट्रिक बसेस कंपनीला किती दंड आकारण्यात आला, याची माहिती देण्यात येत नसल्याने शंका उपस्थित होत आहेत. यातून ठेकेदारांना पाठिशी घालण्याचा प्रकार होत असल्याची चर्चा सुरू आहे.