दौंड – विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून दौंड विधानसभा निवडणुकीत आजी-माजी आमदारांमध्ये चुरशीची लढाई रंगली असून जोतो आपल्यापरीने प्रचारात आघाडी घेत असून जोरदार प्रचाराचा “रणसंग्राम’ सुरू आहे. कुलांनी बेरजेचे राजकारण केल्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र सध्यातरी मतदारसंघात दिसत आहे.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार राहूल कुल यांनी बेरजेचे राजकारण करीत राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते भाजपच्या गोटात दाखल केले आहेत. यात धनगर समाजाचे नेते व भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात आणि दौंडच्या राजकारणातील मास्टरमाइंड, अशी ओळख असणारे महेश भागवत यांचा समावेश आहे, तर दुसरीकडे आघाडीचे उमेदवार रमेश थोरात हे एकाकी पडल्याचे बोलले जात आहे. आमदार राहुल कुल म्हणाले की, विकासकामांच्या जोरावर महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे.
तालुक्यासाठी 1400 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला मोठा हातभार लागल्याचा दावा आमदार कुल यांनी केला आहे. तर दुसरीकडे थोरात यांच्याकडून भीमा पाटसवर टीका केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत.
आमदार कुल यांच्याकडे प्रेमसुख कटारिया, नंदू पवार, वासुदेव काळे, आनंद थोरात, महेश भागवत, रंजना कुल, कांचन कुल, नागसेन धेंडे, अनिल सोनवणे, तानाजी दिवेकर, गणेश आखाडे, हरीश खोमणे, रवींद्र दोरगे, दादा केसकर हे प्रमुख प्रचारक आहेत. तर आघाडीकडे वीरधवल जगदाळे, अप्पासाहेब पवार वैशाली नागवडे नाना फडके अशी प्रचारकांची नावे आहेत. कुल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी ऐनवेळी साथ दिल्याने सध्यातरी कुल यांचे पारडे निवडणुकीत जड वाटत आहे.