निमसाखर -जलसंपदा खात्याकडून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी पहिले आवर्तन सुरू होऊन दीड महिना झाला आहे. मात्र, आवर्तन देताना शेती व पिण्यासाठी पुरेसे पाणी न मिळता अवैध सायफनधारकांनाच जास्त फायदा होत आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील नीरा डाव्या कालव्यावरील आवर्तन विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित प्रशासनाने अवैध सायफन टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या नीरा डावा कालवा अंतर्गत असणाऱ्या 54 फाट्यासह अन्य फाट्यांनाही आवर्तन सुरू आहे. सध्या वाढता उन्हाचा चटका वाढला असताना शेतकरी आणि ग्रामस्थ पुरते होरपळून निघाले आहेत.
54 फाट्यावरील शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचे तलाव योग्यरीत्या न भरल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मेन फाटा व कालवा अंतर्गत अवैध सायफनचे प्रमाण वाढतच चालले आहे. 54 फाट्यातून सायफन 14 किलोमीटरपर्यत पाणी गेले आहे. याच बरोबर नीरा डाव्या कालव्याबाबतही हीच परिस्थिती आहे.