नितीन साळुंखे
नागठाणे – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आल्याने उद्योगधंदे ठप्प आहेत. याचा मोठा फटका रसवंतीगृह चालविणाऱ्या व्यावसायिकांना बसला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच गुऱ्हाळांना टाळे ठोकण्याची वेळ अनेक व्यावसायिकांवर आली आहे. परिणामी रसवंतीमुळे दरवर्षी जीवनात येणारा “गोडवा’ हरवला आहे.
मार्च, एप्रिल व मे हे उन्हाळ्यातील तीन महिने उसाच्या गुऱ्हाळांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नियोजन करून हे व्यावसायिक शहरात गर्दीच्या ठिकाणी रसवंतीसाठी जागा निश्चित करतात. त्यासाठी चार किंवा पाच आकडी भाडे देऊन गाळे करारबद्ध केले जातात. महामार्गालगत ही व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला जातो. या तीन महिन्यांमधील व्यवसायावरून वर्षाचा ताळेबंद हे व्यावसायिक मांडतात. उन्हाळ्यात नैसर्गिक शीतपेय म्हणून उसाच्या रसाला मोठी मागणी असल्याने एवढे मासिक भाडे भरणे त्यांना फारसे जड जात नाही; पण यावर्षी रसवंतीगृह व्यावसायिकांच्या नशिबाचे फासे उलटे पडले आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस व गारपीट झाली. त्यानंतर हवेत अनेक दिवस गारवा कायम होता. त्यामुळे अनेकांनी भाड्याने गाळे घेऊनही व्यवसाय केला नाही, तर ज्यांनी रसवंतीगृहे सुरू केली, त्यांच्याकडे ग्राहक फारसे फिरकले नाहीत. हे संकट कमी होते की काय म्हणून मार्च महिन्याच्या मध्यात राज्यात करोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. परिणामी लॉकडाऊन घोषित करावे लागले. पर्यायाने रसवंतीगृहांचा व्यवसाय मोडीत निघाला आहे. कमाई शून्य असतानाही दुकानभाडे भरण्याचे संकट त्यांच्यावर ओढवले आहे. वर्षभराचे जमाखर्चाचे गणित जुळवून सुरू केलेला हा व्यवसाय बंद झाल्याने त्यावर गुजराण करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.