अकोले: अंबिकादेवीची कृपादृष्टी संपूर्ण तालुक्यावर असून, देवीने सर्वांवरील दुष्काळाचे सावट दूर करावे व शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवावा, असे साकडे आ. वैभवराव पिचड यांनी निंब्रळ येथील अंबिकामातेला घातले.
निंब्रळ येथील अंबिका माता मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्सहात झाला. या प्रसंगी ते बोलत होते. आ. पिचड व त्यांच्या पत्नी पूनमताई पिचड यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पादुका, कासव, वाघ, कलश यांची टाळ-मृदंगाच्या गजरात व देवीच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेलेल्या लेकी व त्यांच्याबरोबर जावई उपस्थित राहून त्यांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली. यावेळी सर्वांना पुरणपोळीचा महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी राजूरच्या सरपंच हेमलताताई पिचड, अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक मीनानाथ पांडे, प्रकाश मालुंजकर, अशोकराव देशमुख, अशोकराव आरोटे, सुरेश गडाख, आशाताई पापळ, गोरख मालुंजकर, बाळासाहेब देशमुख, उद्योजक माणिकराव डावरे, कार्यकारी संचालक भास्करराव घुले, एकनाथ शेळके, आनंदा मुंढे, देविदास खोंड, तुकाराम घोलप, दत्तात्रय शेलार, मदन महाराज वर्पे, मनोहर महाराज भोर, दीपक महाराज देशमुख, यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, अरुण गायकर, गंगाराम नलावडे, मुंबई-पुणे-नगर येथून आलेले गावकऱ्यांसह सर्व ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. पिचड पुढे म्हणाले, अंबिका देवीच्या कृपाशीर्वादाने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. देवस्थान ट्रस्टसाठी सभामंडप, सुशोभीकरण व इतर सुविधांसाठी जवळपास 75 लाख रुपये निधी मला देता आला, हे माझे भाग्य असून, या देवस्थानचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश केल्यामुळे अनेक कामे मार्गी लागलेली आहेत. यापुढेही उर्वरित कामे पूर्ण करू, असे आश्वासन आ. पिचड यांनी दिले.
सीताराम गायकर म्हणाले, लोकनेते मधुकरराव पिचड व आ. वैभवराव पिचड यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक देवस्थानांची तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत अनेक कामे मार्गी लागलेली आहेत. निंब्रळ गावच्या सर्व ग्रामस्थांनी एकीच्या भावनेतूून कार्य केले. यावेळी यशवंतराव आभाळे यांनी प्रास्ताविकातून देवी मंदिराच्या परिसराच्या विकासकामांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन अरुण गायकर यांनी केले, तर आभार गंगाराम नलावडे यांनी मानले.