मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा व हृदयविकार या औषधांचा साठा संपला
रुग्णांना आर्थिक झळ : 50 प्रकारच्या औषधांचा तुटवडा
डेंग्यूची औषधेही कमीच, रेबीजची लसही उपलब्ध नाही
पिंपरी – पिंपरी-चिंचवड आता टंचाईचे शहर होऊ लागले आहे. त्यात प्रामुख्याने जीवनावश्यक बाबींचीच टंचाई वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई झेलत असलेल्या नागरिकांना आता औषधांची टंचाईही सोसावी लागत आहे. ज्यांची सर्व मदार महापालिकेच्या रुग्णालयावर आहे, अशा गरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरु आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विविध आजारांनी थैमान घातले आहे. सर्दी, खोकला, ताप या साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यात आता इतर गंभीर आजारांवरील औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभागच सलाईनवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या एक महिन्यांपासून महापालिका रुग्णालयामध्ये औषधांची टंचाई भासू लागली आहे. रुग्णालयातील औषध विभागामध्ये औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने रुग्णांना बाहेरून जादा पैसे खर्च करून औषधे घ्यावी लागत आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये सध्या अनेक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. श्वानदंशावरील लस उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा व हृदयविकार या औषधांचा साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला ऐनवेळी धावपळ करावी लागते. रुग्णांनी तपासणी करून घेतल्यानंतर लिहून दिलेली औषधे बाहेरून घ्यावी लागतात. त्यामुळे रुग्णांनाही त्याचा फटका बसत आहे. सध्या डेंग्यूची साथ शहरामध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच एकाच घरातील दोन भावंडाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. त्यातच डेंग्यूच्या औषधांची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे.
वास्तविक पाहता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाहेरून औषधे आणण्यास बंदी आहे. डॉक्टरांनी बाहेरील खासगी मेडीकलमधून औषधे आणण्यास सांगणे अपेक्षित नाही. मात्र औषधांचा तुटवडा असल्यामुळे डॉक्टर बाहेरून औषधे घेण्यास सांगतात. त्यामुळे रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर काही गरीब नागरिकांकडे औषधाइतकेही पैसे नसल्याने त्यांची कोंडी होत आहे. शहरामध्ये महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्व विभाग उपलब्ध असल्याने येथे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच शहराबरोबरच राज्यातील कानाकोपऱ्यातून येथे रुग्ण उपचारासाठी येत असतात. या सर्व रुग्णांची परिस्थिती ही सामान्य ते खूप गरीब अशी असते.
दुसऱ्या रुग्णालयातून मागवावी लागते लस
शहरात सत्तर हजारांच्या आसपास भटकी कुत्री आहेत. ही कुत्री दरवर्षी हजारो नागरिकांचा चावा घेतात. अशी परिस्थिती असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे. ही लस कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे महापालिकेच्या एका रुग्णालयात लस कमी पडली तर दुसऱ्या रुग्णालयातून मागवून घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांची विनाकारण फरफट होते. तसेच काही रुग्णांना ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अँटी रेबीज लस हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ या सरकारी कंपनीकडून पुरविण्यात येणार असल्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे.
मंजुरी मिळूनही औषधांची टंचाई
स्थायी समितीच्या 27 नोव्हेंबरला झालेल्या सभेमध्ये साडेसहा कोटी रुपयांच्या औषध खऱेदीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिकेचे रुग्णालय व दवाखान्यासाठी लागणारे ब्रॅण्डेड व जेनरिक औषधांची खरेदी कऱण्यासाठी 1 कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. तर 182 आयुर्वेदिक औषधांच्या खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सर्जिकल साहित्य खऱेदीसाठीही या वेळी मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दोन महिन्यापूर्वी 18 कोटी रुपयांची औषधे खऱेदी करण्यात आली. त्यामध्ये 600 प्रकारची औषधे खरेदी करण्यात आली.
सध्या औषधे उपलब्ध आहेत. मागच्या वेळेस 18 कोटी रुपयांची औषध खरेदी झाली ती सर्व औषधे आली आहेत. त्यामध्ये 650 औषधे खरेदी करायची होती. मात्र 50 औषधांची निविदा प्रक्रिया झाली नाही, त्यामुळे ती औषधखरेदी झाली नाही. मात्र 600 प्रकारच्या औषधांची खरेदी पूर्ण झाली आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता