Drinking tea in Winter: हिवाळा सुरू झाला की अनेकांची चहा पिण्याची सवय वाढते. सर्वसाधारणपणे चहा शरीर गरम ठेवतो, असा समज आहे. काही जण तर दिवसातून ४–५ कप चहा पितात. मात्र खरंच चहा शरीराला उब देतो का? आणि जास्त चहा पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते का? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मते, दुधाचा चहा पूर्णपणे निरुपद्रवी नाही. विशेषतः रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तसेच जास्त चहा पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) होण्याची शक्यता असते. वैद्यकीय दृष्टिकोनातून चहा शरीर दीर्घकाळ गरम ठेवतो, असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. चहा हे गरम पेय असल्यामुळे ते पिताना किंवा काही मिनिटांपुरत उब मिळते. पण हा परिणाम तात्पुरता असतो. चहा शरीराचं तापमान वाढवत नाही, तर फक्त गरम वाटण्याची भावना निर्माण करतो. दिवसात जास्त चहा पिल्याचे तोटे डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात दिवसातून एक कप चहा पिल्यास काहीच हरकत नाही. मात्र चहा नेहमी रिकाम्या पोटी पिऊ नये. जेवणानंतर किंवा पाणी पिल्यानंतर चहा घेऊ शकता, पण मर्यादेत. दिवसातून दोन किंवा त्याहून अधिक कप चहा प्यायल्यास वारंवार लघवी लागते. त्यामुळे शरीरातून पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. हिवाळ्यात आधीच तहान कमी लागते आणि लोक पाणी कमी पितात. अशा वेळी सतत चहा प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे ओठ कोरडे पडणे, अशक्तपणा जाणवणे असे त्रास होऊ शकतात. चहाऐवजी काय प्यावं? कोमट पाणी तुळस, आलं किंवा दालचिनी चहा दूध न घातलेला चहा ग्रीन टी शरीरात पाण्याची कमतरता कशी ओळखाल? लघवीचा रंग गडद पिवळा होणे तोंड कोरडं पडणं चक्कर येणं सतत तहान लागणं हिवाळ्यात चहा मर्यादित प्रमाणात पिणं ठीक आहे, पण पाण्याचं सेवन कमी होणार नाही, याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. संतुलन ठेवलं, तरच आरोग्य टिकून राहील.