नेवासा – मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात धुवॉंधार पाऊस होत असल्याने धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यातच ओढे नाल्यांना पाणी असल्याने प्रवरा नदीला आलेल्या पुराचे पाणी नेवासा शहरातील वसाहतीत घुसले आहे. तर ज्ञानेश्वर मंदिरामागील चिंचबन रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. दरम्यान या पाण्यामध्ये सोमनाथ गांगुर्डे (वय 30) हा तरुण वाहून गेला आहे. त्याचा अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसीलदार रुपेश सुराणा यांनी केले आहे.
मध्यमेश्वर बंधाऱ्याच्या फळ्या काढणे शक्य नसल्याने पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून शहरातील मारुतीनगर, ज्ञानेश्वर कॉलनी, सदाशिवनगर, गंगानगर, ज्ञानेश्वर मंदिर व विखोना पेट्रोल पंपच्या मागील शेतात व वसाहतीत सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पाण्याचा विळखा पडला असून चिंचबन रोड वाहतुकीस बंद झाला आहे. मध्यमेश्वर बंधाऱ्यावरून तीन फूट पाणी वाहत आहे. पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यात पाटबंधारे विभागाला अपयश आले आहे.
मुळा नदीतुन 12500हजार क्यूसेस पाणी सोडले होते ते आता कमी करून 3500 क्यूसेस सोडण्यात आले आहे. पारनेर परिसरात अजून पाऊस झाल्यास रात्री धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार रुपेश सुराणा यांनी केले आहे व नागरिकांची ज्ञानोदय इंग्लिश स्कूल येथे प्रशासनाकडून राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेमार्फत योग्य ती उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती तहसीलदार सुराणा यांनी दिली. मुळा धरणातून जादा पाणी सोडण्यात येणार असल्याच्या बातम्या सोशल मिडियाद्वारे पसरविल्या जात असल्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे.