माधव विद्वांस
मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते व हिंदुस्थानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 2 मे 1920 रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण नागपूर येथे झाले. त्यांच्या मातोश्री शिक्षिका होत्या व त्या मंदिरातून भक्तिसंगीत म्हणत असत. त्यामुळे संगीताचे संस्कार अगदी बालपणापासूनच त्यांच्यावर झाले होते.
आपल्या आईने गायलेली गाणी ते गुणगुणत असत. त्यांची संगीत शिक्षणाची सुरुवात एका विलक्षण घटनेने झाली. वर्ष 1927 मध्ये ते 7 वर्षांचे होते. तेव्हा बाहेर फिरत असताना पावसात अडकले. त्यामुळे जवळच असलेल्या एका इमारतीत जिन्याच्या आडोश्याला थांबले. तेथे त्यांनी गाणी गुणगुणायला सुरुवात केली. इमारतीत राहणाऱ्या एका सद्गृहस्थाने त्यांचे गुणगुणणे ऐकले आणि छोट्या वसंताला घेऊन आपल्या घरात गेले आणि त्यांस गाणे म्हणण्यास सांगितले. पाऊस ओसरल्यावर छोट्या वसंताला घेऊन त्यांच्या घरी पोहोचले.
त्यांनी वसंतरावांच्या आईला विनंती केली की, या मुलाला संगीत शिक्षणासाठी माझ्याकडे सोपवा. याच्या गळ्यात गोडवा आणि संगीताची त्याला आवड आहे. त्यावर त्यांच्या आईने, माझी त्याच्या संगीत शिक्षणासाठी ऐपत नाही, असे सांगितले असता ते म्हणाले, मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी शिकवणार आहे, असे आश्वासन दिल्यावर त्यांच्या आईने होकार दिला.
वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयात प्रवेश मिळून खऱ्या अर्थाने त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली. वयाच्या केवळ 8 व्याच वर्षी, भालजी पेंढारकर यांनी “कालियामर्दन’ या त्यांच्या चित्रपटात कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण करण्याची संधी त्यांना दिली होती. वसंतराव 1938 साली मॅट्रिक झाले. त्यांनी संगीतामधील पीएच.डी. प्राप्त केली होती.
लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस असणारे त्यांच्या मामांनी त्यांची संगीताची आवड पाहून लाहोरला घेऊन गेले. त्यावेळी लाहोर म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची पंढरी समजली जायची. तेथे ते दोन वर्षे होते. त्यावेळी त्यांनी आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली. तसेच उर्दू भाषा आत्मसात केली. तेथेच उस्ताद बडे गुलाम अली खॉं व उस्ताद बरकत अली खॉं या बंधूद्वयींच्या मैफली ऐकल्या.
“ठुमरी व गझल’ या गायनकलेचा लाहोर मुक्कामीच अभ्यास केला. याच वेळी त्यांनी असद अली खॉं या नावाच्या एका फकिराकडे जाऊन जवळपास सहा महिने केवळ “मारवॉं’ हा एकच राग त्यांच्यापाशी शिकले.
1942 मध्ये लाहोरहून परतल्यावर मग त्यांनी चरितार्थासाठी पुण्यात मिलिटरी अकाउंट्स खात्यात नोकरी व बरोबरच संगीतसाधनेसाठी पंडित सुरेशबाबू माने यांचे शिष्यत्व (1942-1952) पत्करले. त्यांना उस्ताद अमजद अली खॉं यांचेही मार्गदर्शन लाभले. 24 वर्षे नोकरी केल्यावर त्यांनी संगीताला पूर्ण वेळ वाहून घेतले. त्यानंतर त्यांनी जवळपास 80 मराठी व 2 हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले.
पुण्यातील वास्तव्यात त्यांना संगीत व नाट्य क्षेत्रातील पु. ल. देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी व बेगम अख्तर या दिग्गजांचा सहवास मिळाला. “कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने पंडित वसंतराव यांचे नाव सर्वंदूर झाले.
वर्ष 1967 साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला व याच नाटकातील “खॉंसाहेब’ ही व्यक्तिरेखा रसिकांच्या मनात इतकी भरली की त्यांना पु. ल. देशपांडे यांनी “वसंतखॉं देशपांडे’ ही बिरुदावली बहाल केली. या नाटकाचे 527 प्रयोग झाले. त्यांनी सुमारे 57 गीतांना आवाज दिला होता. 30 जुलै, 1983 रोजी त्यांचे निधन झाले.