रेल्वे प्रशासनाला सुनावले : स्थानके दिव्यांगपुरक निर्माण करा
मुंबई : मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त करताना दिव्यांगांना असलेल्या सुविधा या केवळ कागदोपत्री ठेवू नका, तर रेल्वे स्थानके दिव्यांगपुरक वातावरण निर्माण करा, असे खडेबोल सुनावित याचिका निकाली काढली.
रेल्वेच्या दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या “इंडिया सेंटर फॉर ह्यूमन राईट अँड लॉ’ने सहा वर्षांपूर्वी दिव्यांगांच्या हितासाठी कायद्यात असलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तीवाद करताना अपंग व्यक्तींना रेल्वेमध्ये चढता-उतरताना नेहमीच त्रास होतो. एखाद्या वेळेस अपघात घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपंग व्यक्तींच्या सोईसाठी रेल्वेमध्ये सुविधा देण्यात यावी यासाठी डब्यात चढण्या-उतरण्यासाठी उघड झाप होणार रॅम्प तयार करण्यात यावे, जेणे करून अपंग व्यक्तींची गैरसोय होणार नाही अशी मागणी केली.
यावेळी न्यायालयाने रॅम्पसारखी सुविधा ही अत्यंत प्रगत अशी सुविधा आहे. मुळात विकालांगांसाठी पायाभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. मुंबईतील लोकल रेल्वेतून अनेक दिव्यांग प्रवास करतात. त्यांना बस, टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहने परवडत नाहीत.
रेल्वे प्रवास हा जलद आणि सोईस्कर आहे. म्हणूनच स्थानकात दिव्यांगांना सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविा या केवळ कागदावरच ठेवू नका. सर्वच रेल्वे स्थानकांवर दिव्यांगपूरक वातावरण निर्माण करा, असे आदेश देत याचिका निकाली काढली.