– ऋषिकेश जंगम Blood Donate – मानवी जीवन वाचवण्यासाठी सर्वात सोपी, सुरक्षित आणि प्रभावी मदत म्हणजे ‘रक्तदान’. अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती किंवा गंभीर आजारांदरम्यान अनेक रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासते. अशा वेळी एक छोटंसं ‘रक्तदान’ एखाद्याला नवजीवन देऊ शकतं. म्हणूनच ‘रक्तदान’ करणं खूपच महत्वाचं आहे रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नाही, तर मानवतेचं सर्वात मोठं दान मानलं जातं. मात्र आजही अनेक गैरसमज, भीती आणि अपुऱ्या माहितींमुळे लोक रक्तदान करण्यास कचरतात. प्रत्यक्षात योग्य मार्गदर्शन आणि काही मूलभूत अटींची पूर्तता केली, तर रक्तदान पूर्णपणे सुरक्षित असून ते दात्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं. Blood Donate पहिला जागतिक ‘रक्तदान दिन’, कसा सुरु हा दिवस : (Blood Donate) पहिला जागतिक रक्तदान दिन मर्यादित स्वरुपात २००४ मध्ये साजरा करण्यात आला. पुढे २००५ मध्ये, ५८ व्या जागतिक आरोग्य संमेलनादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून जगभरात दरवर्षी १४ जून रोजी हा दिवस ‘जागतिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. Blood Donate रक्तदान कोण करू शकतो हे ठरविण्यासाठी काही मूलभूत अटी आहेत. हे रक्तदाता आणि रक्त घेणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी खूपच महत्वाचे आहे…. रक्तदानासाठी पात्रता : – रक्तदात्याचे वय १८ ते ६५ वर्षे दरम्यान असावे. काही देशांमध्ये पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्यांसाठी कमाल वय ६० असते. – रक्तदात्याचे वजन किमान ५० किलो असावे. कमी वजन असल्यास रक्तदानानंतर अशक्तपणा येऊ शकतो. – पुरुषांसाठी: किमान १३ ग्रॅम/डेसिलिटर. आणि महिलांसाठी: किमान १२.५ ग्रॅम/डेसिलिटर. कमी हिमोग्लोबिन असल्यास रक्तदान करता येत नाही. – पुरुष दर ३ महिन्यांनी (९० दिवस) आणि महिला दर ४ महिन्यांनी (१२० दिवस) रक्तदान करू शकतात. Blood Donate Blood bank कोण रक्तदान करू शकत नाही? – मधुमेह (इन्सुलिन घेत असल्यास), हृदयरोग, कर्करोग, क्षयरोग, एचआयव्ही/एड्स, मलेरिया यांसारखे आजार असलेले नागरिक रक्तदान करू शकत नाहीत. – गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर ६ महिन्यांपर्यंत आणि स्तनपान काळात रक्तदान करता येत नाही. – मासिक पाळीदरम्यान किंवा लगेच नंतर रक्तदान करणे टाळावे. – काही औषधे (उदा. अँटिबायोटिक्स) घेत असल्यास किंवा कोविड-१९ लस घेतली असल्यास ठराविक कालावधीनंतरच रक्तदान करता येते. – मद्यपान किंवा ड्रग्जचे व्यसन असलेले किंवा रक्तदानाच्या २४ तास आधी मद्यपान केलेले लोक रक्तदान करू शकत नाहीत. – टॅटू किंवा पियर्सिंग केले असल्यास ६ महिने ते १ वर्ष थांबावे लागते, कारण संसर्गाचा धोका असू शकतो. Blood Donate रक्तदानापूर्वी काय करावे? – पुरेशी झोप घ्यावी. – पौष्टिक आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावे. – डॉक्टरांना आपला वैद्यकीय इतिहास सांगावा. त्यांचा सल्ला घ्या. महिलांनी रक्तदान करण्याचे फायदे : – रक्तदानामुळे महिलांचेही रक्त संतुलित राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. – रक्ताची गरज सर्वांसाठी असते, आणि महिलांचे रक्तदान गर्भवती महिलांसह इतर रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते. – रक्तदान करून महिला स्वतःला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून पुढे आणू शकतात. – महिलांनी दर ४ महिन्यांनी रक्तदान करावे, कारण त्यांचे शरीर रक्तपेशी पुन्हा निर्माण करण्यास थोडा जास्त वेळ घेते. गैरसमज-अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्त रक्तदान करा… रक्तदानाबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत, ज्यामुळे लोक रक्तदान करण्यास संकोच करतात. त्यामुळे या अफवांवर विश्वास न ठेवता आपण रक्तदान करायला हवे. – रक्तदान केल्याने शरीर कमजोर होते. मात्र रक्तदान केल्यानंतर शरीर २४ तासांत प्लाझ्मा आणि ४-६ आठवड्यांत रक्तपेशी पुन्हा निर्माण करते. निरोगी व्यक्तीवर याचा दीर्घकालीन परिणाम होत नाही. – रक्तदान करणे वेदनादायक असते. रक्तदानादरम्यान फक्त सुई टोचल्याची थोडीशी जाणीव होते, जी सहन करण्यायोग्य असते. संपूर्ण प्रक्रिया वेदनारहित आणि सुरक्षित असते. – रक्तदानामुळे रोग पसरतात. रक्तदान केंद्रांमध्ये नवीन, निर्जंतुक सुई वापरली जाते, त्यामुळे संसर्गाचा धोका नसतो. कोणताही रोग पसरत नाही. – प्रत्येकजण रक्तदान करू शकतो. प्रत्येकजण रक्तदान करू शकत नाही. वय, वजन, आरोग्य आणि वैद्यकीय इतिहास तुमची पात्रता ठरते. (उदा., गर्भवती महिला, कमी हिमोग्लोबिन असलेले लोक रक्तदान करू शकत नाहीत.) – रक्तदानासाठी खूप वेळ लागतो. रक्तदानाची प्रक्रिया फक्त १०-१५ मिनिटे लागते, तर संपूर्ण तपासणी आणि विश्रांतीसह ३०-४५ मिनिटांत काम पूर्ण होते. – वारंवार रक्तदान केल्याने रक्त कमी पडते. निरोगी व्यक्ती दर ३ महिन्यांनी (पुरुष) किंवा ४ महिन्यांनी (स्त्रिया) रक्तदान करू शकते. “दान करा रक्ताचे, वाचेल आयुष्य एखाद्याचे…” रक्तदान संदर्भात आपल्या समाजात आज देखील अनेक गैरसमज आणि खोट्या अफवा पसरवल्या जातात. मात्र यासगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एक जबादार नागरिक म्हणून आपण या मोहिमेत सामील होणे ही काळाची गरज आहे. आणि इतरांना देखील या मोहिमेचा एक भाग करून घेणे ही सुद्धा आपलीच जबादारी आहे. रक्तदान अनमोल आहे. आपले मौल्यवान रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. त्यामुळे “दान करा रक्ताचे, वाचेल आयुष्य एखाद्याचे…” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे.