मुंबई – भारतातील सर्वात मोठ्या 75 कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूक जास्त पातळीवर असते. मात्र 2010 नंतर प्रथमच या मोठ्या 75 कंपन्यांमध्ये देशातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक एप्रिल ते जून या तिमाहीत वाढली आहे.
या तिमाहीत देशातील गुंतवणूकदारांची म्हणजे म्युच्युअल फंड आणि किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक 7.20 टक्क्यांनी वाढून 25.5% इतकी झाली आहे. तर याच काळात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची या कंपन्यातील गुंतवणूक 2.30 टक्क्यांनी कमी होऊन 24.8% इतकी झाली आहे. मॉर्गन स्टॅन्ली या ब्रोकरेज संस्थेने केलेल्या पाहणीत ही बाब आढळून आली आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत कंपन्याच्या प्रवर्तकाची या कंपन्यातील गुंतवणूक 0.2% कमी झाली आहे. आता या कंपन्यातील प्रवर्तकाची गुंतवणूक 44.9% वर आली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराची या कंपन्यातील गुंतवणूक सप्टेंबर 2021 मध्ये वाढून 26.9% पर्यंत गेली होती. मात्र नंतर करोनाचा प्रादुर्भाव आणि इतर कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या कंपन्यातून गुंतवणूक कमी करणे सुरू केले आहे.
दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ झाली. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाले. त्यामुळे रुपया घसरून डॉलर वधारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे परदेशी संस्थाकडून गुंतवणूकदारांनी गेल्या काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक परत काढून घेणे चालूच ठेवले आहे. मात्र गेल्या आठवड्यामध्ये फेडरल रिझर्व्हने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदर वाढ माफक प्रमाणात करण्यात आली.
त्याचबरोबर मंदी टाळण्यासाठी आगामी काळात व्याजदरवाढ कमी करण्याचे संकेत देण्यात आल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू केली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आगामी काळातही या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील खरेदी वाढविली तर निर्देशांकांना चांगलाच आधार मिळणार आहे. आतापर्यंतच्या देशातील ज्या गुंतवणूकदारांनी या मोठ्या कंपन्या गुंतवणूक केली त्यांना नजीकच्या भविष्यात चांगला फायदा होण्याची शक्यता दिसून येते.