मुंबई – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये खासगी आणि सावर्जनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपुरातील सभेत मोठी गर्दी झाल्याचे समोर आले आहे. यावर आता विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार पंढरपुरात आहेत. या सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी करोनासंबंधित नियमाचे पालन करण्यात आले नसल्याने भाजप नेत्यांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, एका अर्थाने मोगलाई आली आहे. हम करे सो कायदा. आम्ही कसलेही कायदे पाळणार नाही असं. शरद पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं. आम्ही सहकार्य करत आहोतच ना. आमचा प्रचंड विरोध होता पण एका शब्दाने बोललो का. आता अजित पवारांवर कारवाई करा मग. आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत, असे आव्हानच त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे म्हटले आहे. सरकारने जी नियमावली तयार केली होती त्यातून पंढरपूर निवडणूक वगळण्यात आली होती अशी माहिती त्यांनी दिली. भाजपाला त्यांचा उमेदवारासाठी परवानगी हवी असेल तर त्यांनाही दिली जाईल. राष्ट्रवादीसाठी वेगळा नियम नाही, असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.