माजी खासदार किरीट सोमय्यांची टीका
मुंबई: राज्यात गेली अनेक दिवस सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पूर्णविरामी मिळाला. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच भाजपने आक्रमक पवित्र घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती देत, अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, शिवसेनेने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. २ लाख कोटींच्या विकासकामांचे प्रकल्प स्थगित केले. रेल्वे, मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो, समृद्धी महामार्ग, अनेक रस्ते प्रकल्प सर्वांना स्थगिती दिली का? कंत्राटदारांना सिग्नल द्यायचा आहे का? येऊन भेटावे असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला.
तसेच हे शिवसेनेच्या या निर्णयांचा भाजप निषेध करत असून, हे प्रकल्प रखडल्याने त्यांची किंमत वाढणार असल्याने त्याला शिवसेनाच जबाबदार असेल असेही सोमय्यांनी म्हटले आहे.
सोमय्या आणि शिवसेनेतील वैर सर्वानाच माहित आहे. शिवसेनेच्या दबावामुळेच भाजपने सोमय्यांचे तिकीट कापले होते. तर सोमय्यांनी देखील मातोश्रीसह उद्धव ठाकरे, राहुल शेवाळेंवर अनेकवेळा गंभीर आरोप केलेले आहेत.