पुणे -पुणेकरांना पुरेसे पाणी देत असल्याचा दावा प्रशासन करत असले, तरी महापालिकेच्याच उपक्रमाने या दाव्यावर पाणी फेरले आहे. नागरिकांना पाण्यासंदर्भातील तक्रार 24 तास करता यावी, यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर 1 ते 15 मार्चपर्यंत सुमारे 594 तक्रारी आल्या आहेत.
प्रशासनाकडे आलेल्या सर्वाधिक तक्रारी कमी दाबाने पाणी येण्यासह, दोन दोन दिवस पाणीच येत नसल्याच्या आहेत. यातील सुमारे 325 तक्रारी सोडविण्यात आल्या असल्या, उर्वरित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत. महापालिकेने शहरातील सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी “पीएमसी केअर हेल्पलाइन’ सुरू केली आहे. मात्र, अनेकदा हेल्पलाइन बंद असते. पाणी हा दैनंदिन विषय असतानाही त्याबाबतच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत.
त्यामुळे महापालिकेने नवीन हेल्पलाइन सुरू केली. समान पाणी योजनेअंतर्गत महापालिकेस पाण्याची 24 तास हेल्पलाइन असणे बंधनकारक आहे, यानुसार सदर सेवा नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्वाधिक तक्रारी नवी गावे, उपनगरांमधून
या हेल्पलाइन क्रमांकावर उपनगरे, समाविष्ट गावांमधून म्हाळुंगे, कात्रज परिसरातील गावांसह मुंढवा, केशवनगर भागांतून पाण्याच्या सर्वाधिक तक्रारी येत आहेत. त्यात प्रामुख्याने पाणी पुरवठा विस्कळीत होणे, दोन दोन दिवस पाणीच न येणे, वेळेवर पाणी न येणे अशा तक्रारी आहेत. तर म्हाळुंगेमधील एका सोसायटीमधील जवळपास 25 ते 30 नागरिकांनी पाणी येत नसल्याची स्वतंत्र तक्रार केली आहे. तर काही तक्रारी नळजोड वेळेत न मिळणे, इतरांनी मोटारी बसविल्याने पाणी न मिळणे, अनधिकृत नळजोड घेतल्याच्या तक्रारींचाही समावेश आहे.
या आहेत सर्वधिक तक्रारी
कमी दाबाने पाणी येते
पाणी खूप कमी येते
दोन दोन दिवस पाणीच येत नाही
पाणी पुरवठ्याची वेळ बदला
वेळेवर पाणी येत नाही
पाणी गढूळ तसेच घाण येते
मीटर बसविल्यानंतर पाणी कमी झाले
पाणी बंद नंतर वेळेवर येत नाही पाणी