ताणाचा निचरा होण्यासाठी प्रभावी मार्ग म्हणजे व्यायाम. मात्र ताण असताना कोणताही व्यायाम करण्यापेक्षा असाच व्यायामप्रकार निवडावा की ज्यामध्ये शरीराच्या अनेक सांध्यांची हालचाल होईल, पण दमछाक होणार नाही.
अशा प्रकारात संथ गतीनं दीर्घकाळ पायी चालणं, संथ गतीनं सायकल चालवणं किंवा संथ गतीने पोहणं, योगासने इ. समावेश होतो. व्यायामात स्नायूंचे आकुंचन-प्रसरण होणं जसं अभिप्रेत असतं तसंच स्नायूंच्या कमाल शक्तीच्या दोनतृतीयांश एवढी शक्ती वापरून स्नायूंचे जे आकुंचन होईल ते सहा सेकंद टिकवून धरणं म्हणजे व्यायाम होय.
ताणाच्या परिस्थितीत स्नायूंचे आकुंचन दीर्घकाळ टिकून राहतं त्यामुळे त्यातं नेहमीएवढं रक्त जाऊ शकतं नाही. शिवाय स्नायूंमध्ये तयार होणारं लॅक्टिक ऍसिड रक्तप्रवाहाबरोबर बाहेर न पडल्याने अंगही दुखू लागतं व स्नायूंवर विपरीत परिणाम होतो. ताणाच्या परिस्थितीत होणारे हे विपरीत परिणाम टाळण्यासाठी स्नायूंना पुरेसा प्राणवायू आणि ऊर्जा मिळायला हवी. त्यासाठी स्नायूंची हालचाल म्हणजेच आकुंचन-प्रसरण होण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच व्यायामाला पर्याय रहात नाही.
दूरपर्यंत पायी फिरायला जाणं हा पण एक ताणाचा निचरा करण्यासाठी उत्तम मार्ग ठरतो. पण या प्रकारात मानसशास्त्रीयदृष्ट्या आणखी एक फायदा होतो तो म्हणजे समस्या निर्माण झालेल्या ठिकाणापासून शरीरदृष्ट्या आपण दूर जातो. अशाप्रकारे दूर गेल्यानंतर आपलं मनही त्या समस्येपासून दूर जातं.
मनासाठी हा बदल आवश्यक असतो, गरजेचा असतो. मनाला रंजन हवं असतं. आपण लांब फिरायला गेलो की तेथे वारा वाहत असतो, झाडांची पानं हालत असतात. काही गळत असतात ताणाच्या परिस्थितीपेक्षा हे वातावरण वेगळं असतं. त्यामुळे या बदलाचा मनावर परिणाम होतो आणि ते उल्हासित होतं.