नवी दिल्ली – देशाचा गृहमंत्री देशाचा कारभार करायचे सोडून येथे बंगाल मध्ये येऊन बसला आहे. त्यांनी आमच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे कटकारस्थान सुरू केले आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून माझ्या सुरक्षा यंत्रणेच्या प्रमुखालाही बदलण्यात आले आहे. मला ठार मारण्याचा आणि निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे काय असा संतप्त सवाल तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.
देशाच्या निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपुष्टात आली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. निवडणूक आयोग अमित शहा आणि भाजपच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या की अमित शहा हेच निवडणूक आयोग चालवत आहेत आणि त्यांनी दिलेल्या सुचनेनुसारच त्यांचा कारभार सुरू आहे. माझ्या सुरक्षा यंत्रणेचा प्रमुख शहांच्या सांगण्यावरूनच निवडणूक आयोगाने बदलला आहे असा आरोपही त्यांनी केला.
नंदीग्राम येथे झालेल्या घटनेवरून निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख विवेक सहाय यांना निलंबीत केले आहे त्यावरून त्यांनी हा आरोप केला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने त्यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले आहे की नंदीग्राम येथील घटनेत ममता जखमी झाल्या असून त्या घटनेला सहाय हेच जबाबदार असल्याने त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. ममतांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्याच्या पोलिसांवर देण्यात आली आहे.