नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.त्यात आम आदमी पक्षानेदेखील आंदोलनाला समर्थन दर्शविले आहे.दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीवरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केजरीवालांवर सडकून टीका केली आहे.
तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. याविरोधात भारत बंद पाळला असून, दुसरीकडे राजकीय कलगीतुराही बघायला मिळत आहे. आपचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंघू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती.
या भेटीवरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केजरीवालांवर टीका केली आहे. “एक अशी व्यक्ती जिने केंद्र सरकारने केलेले तिन्ही वादग्रस्त कायदे दिल्लीत लागू करण्यासाठी अजिबात उशीर केला नाही. तिच व्यक्ती आता सार्वजनिक ठिकाणी स्वतःला शेतकऱ्यांचा सेवक म्हणून घेत आहे. त्यांना गहू व तांदूळ यातील फरक तरी माहिती आहे का?” असा सवाल सिंह यांनी केजरीवाल यांना केला.
अमरिंदर सिंह यांनी केजरीवाल यांना शेतकऱ्यांसाठी केलेल्या एक काम दाखवण्याचेही आव्हान दिले आहे. आपने एका कायद्याची अधिसूचनाही काढली आहे, असा दावाही सिंह यांनी माध्यमांशी बोलताना केला.