नवी दिल्ली – दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे नेते आमदार राजेंद्र पाल गौतम यांनी केलेल्या विधानामुळे राजधानीत नवा वाद निर्माण झाला असून गौतम यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. आपचा खरा चेहरा पुन्हा उघड झाला असून केवळ हाच पक्ष नाही तर विरोधकांची देशव्यापी इंडिया आघाडीच सनातन विरोधी असल्याची टीका भारतीय जनता पार्टीने केली आहे.
दिल्लीच्या सीमापुरी विधानसभा मतदारसंघातील लहराडा गावात येथील आमदार राजेंद्र पाल गौतम यांची सभा झाली. यावेळी आपल्या भाषणात ते म्हणाले की, प्रभू श्रीरामाला मानू नका आणि त्यांची पूजा करण्यासाठी मंदिरातही जाऊ नका. दलित समुदायातील महिला मंदिरात का जातात आणि का रामाची पुजा करतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच त्या तेथे जातात आणि तेथे त्यांच्यावर बलात्कार होतो आणि त्यांची हत्याही केली जाते असे खळबळजनक विधानही गौतम यांनी केले. त्यांच्या विधानावरून राजधानी दिल्लीतील पारा वर चढला असून गौतम यांच्या विधानांवरून आपचा हिंदू विरोधी चेहरा समोर आला असल्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते हरिश खुराना यांनी म्हटले आहे. तर भाजपचे वीरेंद्र सचदेवा यांनीही आम आदमी पार्टीवर टीका केली आहे.
खुराना म्हणाले, केवळ आपच नाही तर इंडिया आघाडीचे सगळेच नेते हिंदू विरोधी आहेत आणि ते सनातन धर्माच्या विरोधात भाषणबाजी करत असतात. मग ते द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलीन असोत, समाजवादी पक्षाचे स्वामीप्रसाद मौर्य असोत किंवा आता आपचे राजेंद्र पाल गौतम असोत.
ही सर्व मंडळी हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान करतात आणि आमच्या मंदिरांचा अपमान करतात. राजेंद्र पाल गौतम यांच्या या विधानांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच जबाबदार आहेत व त्यांच्याच सांगण्यावरून गौतम अशी वक्तव्ये करत आहेत आणि देवतांचा अपमान करत आहेत. केजरीवाल यांनी लांगुलचालनाचे राजकारण थांबवावे आणि गौतम यांची ताबडतोब पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही भाजपने केली.