देवदत्त निकम : वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारांशी साधला संवाद
मंचर – गेल्या 30 वर्षांत चांडोली परिसरातील विकासकामे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मुळेच मार्गी लागली आहेत. वळसे-पाटील यांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून द्या. त्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांसह अहोरात्र कष्ट घेत आहोत. मतदारांनी सजग राहुन विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केले.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) परिसरातील वाड्या-वस्त्यांवर देवदत्त निकम आणि कार्यकर्त्यांनी मतदार व नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी उपसरपंच संदीप थोरात, चांडोली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप थोरात, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम थोरात, युवक अध्यक्ष प्रमोद थोरात, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सागर थोरात, शरद खेडकर, पोपट थोरात, शरद बॅंकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत थोरात, सुलोचना सुकाळे, भारती मावकर, वैभव थोरात, वसंत थोरात, गोरक्ष थोरात आदी उपस्थित होते.
चांडोली गावातील नदीवरील केटीवेअर बंधारे वीज-पाणी, स्टीट लाईट, मंदिरासमोरचे सभामंडप, अंगणवाड्या, पाणीपुरवठा योजना, वाड्या-वस्त्यांवरील डांबरीकरण, जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या अशी गावातील कामे वळसे पाटील यांच्यामुळे मार्गी लागली आहेत, त्यामुळे आम्ही चांडोली ग्रामस्थ वळसे पाटील यांच्या पाठीशी एकदिलाने उभे असल्याचे माजी उपसरपंच संदीप थोरात यांनी सांगितले.
मताधिक्यासाठी गावा-गावांत चढाओढ
विरोधक फक्त पोपटपंची करतात. विकास कामाची त्यांना घेणेदेणे नाही. विकासकामात राजकारण आणतात; मात्र त्यांच्या दिखाव्याला जनता भुलणार नाही. दिलीप वळसे पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील गावागावांतील मतदार सरसावले आहेत. कळंब-रांजणी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये मताधिक्य देण्यासाठी अक्षरश: चढाओढ लागली आहे, त्यामुळे वळसे-पाटील यांना भरभरून मताधिक्य मिळेल, असे देवदत्त निकम यांनी नमूद केले.