पुणे : पाच दिवसांचा आठवडा ही जिव्हाळ्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य करून त्याची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून (दि.29) होणार आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचा आनंद द्विगुणीत झालेला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे.
या सुटीच्या मोबदल्यात कामाची वेळ वाढलेली आहे. याकरिता अधिकारी महासंघाच्या वतीने शासनास अधिक कामाची हमी दिलेली आहे. कामाची तत्परता, गतिमानता, पारदर्शकता, सकारात्मकता आणि सौजन्यता ही गुणात्मकता विचारात घेऊन जनतेमध्ये प्रशासन लोकाभिमुख करण्याचे कर्तव्य व कार्यसंस्कृती अभिमान म्हणून अधिकारी व कर्मचारी कायम वचनबद्ध राहणार आहेत.
पाच दिवसांच्या आठवड्यामुळे निर्माण झालेल्या उत्साह व ऊर्जेचा उपयोग विकासाची प्रतिमा उंचाविण्यासाठी करू या, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने सर्व अधिकारी यांना केले आहे.
याकरिता अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यालयात एकत्रित येऊन जनतेस कामाची ग्वाही देवून वचनबद्ध होणार आहेत, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष हनुमंत धुमाळ, अध्यक्ष एन. पी. मित्रगोत्री आणि कार्याध्यक्षा डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.