रिकाम्या हातीनागरिक परताहेत घरी समीर भुजबळ वाल्हे – गरिबांची दिवाळी यंदा गोड व्हावी याकरिता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने याकरिता स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय मागील काही दिवसांपुर्वी घेतला होता. मात्र, या निर्णयाची पुरंदर तालुक्यात अद्यापही अंमलबजावणी सुरू झालेली कुठेही दिसत नाही. स्वस्त धान्य दुकानात सामान्य नागरिक जाऊन सरकारने घोषणा केलेल्या वस्तू आल्यात का? असे विचारत आहे. त्यात अद्यापही या वस्तु न आल्याचे कळताच नागरिक नाराजी व्यक्त करत असून रिकाम्या हाती घराकडे परतत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना विचारणा केली असता हा संच अजून उपलब्ध झाला नसून आम्ही या संचासाठी पैसे भरले असून लवकरच उपलब्ध होईल. वितरण केले जाईल, असे सांगण्यात आले; मात्र दिवाळी जवळ येऊन ठेपला असल्याने व घोषणा करून अद्याप लाभ न मिळत नसल्याने शिंदे सरकारने घेतलेला निर्णय कागदावरच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर यावर्षी प्रथमच राज्यातील सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याकरीता सरकारने 100 रुपयांत चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला होता. या सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अनेक जण स्वस्त धान्य दुकानात जाऊन चौकशी करत आहे. स्वस्त धान्य दुकानात दिवाळीच्या वस्तूंची चौकशी करायला गेलेल्या नागरिकांना मात्र रिकाम्या हातीच परतावे लागत आहे. दिवाळी अवघ्या 9 ते 10 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. त्यात अद्यापही दिवाळी वस्तूंबाबत स्पष्टता नाही, त्यामुळे दिवाळी फराळ कधी बनवणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकूणच दिवाळी गोड करण्याची घोषणा अद्यापही कागदावरच असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुरू उमटत आहे. येत्या काही दिवसांत सरकारने नेमून दिलेल्या एजन्सीकडून तालुकास्तरावर पुरवठा केल्यानंतर त्याचे रेशनिंग दुकानांवर वितरण करण्यात येणार आहे. लाभार्थींना त्याचा लाभ पॉस मशिनद्वारे देण्यात येणार आहे. – सुधीर बडदे, पुरंदर तालुका पुरवठा अधिकारी. 37 हजार 244 लाभार्थी पुरंदर तालुक्यात अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थी 5 हजार 248 तर, प्राधान्य योजना लाभार्थी अंतर्गत 31 हजार 996 लाभार्थी असून एकूण लाभार्थी 37 हजार 244 आहेत. या वस्तू मिळणार लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलचा संच दिला जाणार असल्याची घोषणा केली होती.