गोंदवले (प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गोंदवले बुद्रुक येथील श्री चैतन्य रुग्णालय व भक्त निवासांची पाहणी केली. आगामी काळात गरज भासल्यास याठिकाणी रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर समितीच्यावतीने श्री चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. लॉकडाऊन काळात मात्र हे रुग्णालय देखील बंदच आहे. जिल्ह्यात करोनाबधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आवश्यकता भासल्यास या रुग्णालयाचा वापर करता येऊ शकतो. या उद्देशाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी या रुग्णालयाची संपूर्ण पाहणी केली. याशिवाय करोना रुग्णांचे विलगीकरण करता यावे म्हणून समाधी मंदिर परिसरातील भक्तनिवासांचीही पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.
यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बी. एस. माने, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, मंदिर समितीचे विश्वस्त तसेच अंगराज कट्टे, प्रवीण भोसले, मंडलाधिकारी श्री. कर्णे,तलाठी श्री. इनामदार, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार उपस्थित होते. समाधी मंदिर तसेच भक्तनिवास हे लोकवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी आहे.
त्यामुळे करोना बधितांना येथे विलगीकरण केल्यास लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. श्री चैतन्य रुग्णालयातसुद्धा कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. तसेच या रुग्णालयात अत्यावश्यक व अतिदक्षतेच्या सुविधासुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे करोनाच्या रुग्णांसाठी वापर करण्याबाबत समाधी मंदिर समिती व ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.