सातारा -जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने करोना लॉकडाऊनमध्ये बळीराजाला आधार देण्यासाठी मोठे पाऊल उचलेले आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विविध कर्जांवरील व्याजदरात कपात करुन शेतकऱ्याला आधार दिला आहे. जिल्हा बॅंकेशी संबंधित सर्व प्रकारच्या संस्था, सहकारी कारखाने, पगारदार कर्मचारी, व्यक्तिगत कर्जे, त्याचबरोबर इतर कर्जावरील व्याजदर 0. 50 ते 2 टक्क्यांपर्यंत कमी केला असून याचा फायदा जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी आणि कर्जदार खातेदारांना होणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
साखर कारखानदारी अडचणीत आहे. बॅंकेशी संलग्न शिक्षणसंस्था, शिक्षणेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात बॅंकेच्या कर्ज योजनांचा लाभ घेतला आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसाय, उद्योगधंद्यासाठी कर्जपुरवठा केला आहे. महिला बचतगट, शेतकरी मंडळे, नोकरदारांच्या पतसंस्था, पाणीपुरवठा संस्था, ग्राहक संघ, खरेदी विक्री संघ, विकास संस्था, सहकारी कारखाने या सर्व ग्राहकांवर करोनामुळे अभूतपूर्व असे संकट आले आहे. सर्व काही ठप्प झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा बॅंकेच्या शुक्रवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेस सहकारमंत्री आणि तज्ज्ञ संचालक बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक अनिल देसाई, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “जिल्ह्यात द्राक्षबाग, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. बॅंकेने या व्यवसायाला कर्जपुरवठा केला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी परतफेड केलेल्या वसूलपात्र हप्त्यावरील व्याजाचा परतावा न देण्याचे धोरण घेतले असून त्यासाठी 50 लाखांची तरतूद केली आहे.
पगारदार कर्मचाऱ्यांना 35 लाखांपर्यंतचा विमा देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्याचा फायदा बॅंकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे. सोनेतारण कर्जपुरवठ्यावरील व्याजदरात 1.25 टक्के कपात करुन ग्राहकांना 10 टक्के दराने प्रतिग्रॅममागे 28,500 रुपये सोनेतारण कर्ज उपलब्ध केले आहे. दरम्यान, व्याजदर कपातीने सभासदांना दिलासा मिळणार असलातरी बॅंकेवर याचा अंदाजे बारा कोटींचा बोजा पडणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आली.