पुणे : अधुनिक तंत्रज्ञानामुळे जगात अनेक बदल झाले आहेत. हे बदल आता न्यायालयीन कामकाजात दिसून येत आहेत. न्यायालयाकडून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आता मध्यस्थीसाठीही तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे अमेरिकेतील व्यक्तीशी संवाद साधून मध्यस्थी करण्यात आली. पती-पत्नीचा दावा घटस्फोटाद्वारे निकाली काढण्यात आला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य मध्यस्थ ॲड. अतुल गुंजाळ यांनी या प्रकरणात यशस्वी मध्यस्थी केली. माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) यांचा विवाह २०२२ मध्ये झाला. दोघेही उच्चशिक्षित आहेत. तो आयटी क्षेत्रात अभियंता आहे. तर ती डॉक्टर आहे. वैचारिक मतभेदामुळे काही दिवसातच दोघांचे पटेनासे झाले. अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत दोघे वेगळे राहू लागले. त्याने २०२२ मध्येच घटस्फोटासाठी ॲड. निकिता अगरवाल यांच्यामर्फत दावा दाखल केला. तर तिच्या वतीने ॲड. विनोद अंबड व ॲड. जयश्री काळे पालवे हजर झाले. हा दावा जिल्हा न्यायाधीश एस.बी. शेलार यांच्या न्यायालयात प्रलंबित होता. तेथून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मध्यस्थीसाठी पाठविण्यात आला. प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी हा दावा ॲड. अतुल गुंजाळ यांच्याकडे मध्यस्थीसाठी पाठवला. माधव सध्या अमेरिकेतील मिशिगन शहरात नोकरीस आहे. चर्चे अंती सुमारे ३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दाव्यात दोघे घटस्फोटासाठी तयार झाले. माधव अमेरिकेत असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क केला. त्याने अॉनलाईन घटस्फोटासाठी संमती दर्शविली. त्यानंतर ई-मेलवरूनही त्याची संमती घेण्यात आली. थोडक्यात माधव अमेरिकेला असूनही तो प्रत्यक्षात हजर न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केस निकाली निघाली. मध्यस्थीमुळे जिंकले, हरल्याची भावना राहत नाही. दावा निकाली निघाल्यामुळे न्याय संस्थेवरील ताण कमी होतो. वेळ, पैशाची बचत होते. होणाऱ्या मानसिक त्रासातून पक्षकारांची मुक्तता झाली. आता दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे आहेत. ॲड. अतुल गुंजाळ, मुख्य मध्यस्थ, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण