- सहायक स्थापत्य अभियंत्याची माहिती
पिंपरी – पवना धरण परिसरात बुधवारी 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 98 टक्के इतका आहे. 100 टक्के धरण भरल्यानंतरच पाण्याचा विसर्ग केला जाईल, अशी माहिती सहायक स्थापत्य अभियंता अन्वर तांबोळी यांनी दिली.
सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पवना धरण 100 टक्के भरले होते. त्यानंतर पाऊस थांबला. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे 13 ऑक्टोबर रोजी धरणातील पाणीसाठा 96.89 टक्क्यांवर आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठा 97.17 वर आला. तर बुधवारी पवना धरण परिसरात 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने धरणातील पाणीसाठा 98.00 टक्क्यांवर आला आहे.
याबाबत बोलताना तांबोळी म्हणाले, “सध्या ऑक्टोबर महिना सुरू आहे. सध्याचा पाऊस हा परतीचा आहे. आता जर पवना धरणातून पाणी सोडले तर पुढील काही दिवसांत पाऊस होईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे धरण 100 टक्के भरल्यानंतरच पाण्याचा विसर्ग केला जाईल. सध्या पवना धरण परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. जर धरणातून पाण्याचा विसर्ग करायचा असेल तर याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आणि सर्व संबंधितांना सतर्क केले जाईल.”