खातेदार-तलाठी वाद : सर्व्हरच्या त्रासाने तलाठ्यांकडून “डीएससी’ जमा
वडगाव मावळ – संगणकीय सात-बारा सर्व्हरच्या मंद गतीला नागरिकांसह अधिकारीही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मावळ, हवेली तालुक्यातील तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी आपल्या डीएससी (डिजीटल सिग्नेचर सर्टिफिकेट) तहसील कार्यालयात जमा केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी सात-बारा, आठ “अ’ उतारा, ई -फेरफार व नवीन फेरफार नोंदणी होणार नसल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. तलाठी स्तरावरील शेतकऱ्यांची ऑनलाइन कामे ठप्प झाल्यास नागरिक व प्रशासनामध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसून येत आहे.
सात-बारा संगणकीकरणाचे काम “एनआयसी’च्या (नॅशनल इंफॉर्मेशन सेंटर) देखभालीखाली होत असते. “सर्व्हर’च्या तांत्रिक अडचणी, गतीची समस्या किंवा इतर कार्य “एनआयसी’च्या माध्यमातून केले जाते. मात्र वारंवार “सर्व्हर बंद’ पडणे, गती नसणे, कार्यालयीन वेळेत सर्व्हर सुरू न होणे, यामुळे तलाठ्यांना ऑनलाईन कामे करणे अशक्य झाले होते. यामुळे खातेदार व तलाठ्यांमध्ये वाद होऊ लागले. त्यातच कामाची पेंन्डसी वाढवल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तरे देताना तलाठी व मंडलाधिकारी यांची ससेहोलपट होऊ लागल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडल्याच्या तक्रारी वाढल्याने तलाठी व मंडलाधिकारी संघटनेने याबाबत वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे वारंवार कैफियत मांडली.
अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी नुकतीच तातडीने बैठक घेऊन याबाबत “एनआयसी’ला सूचना दिल्या होत्या. या बैठकीस रजा राखीव उपजिल्हाधिकारी संजय तेली, ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, कुळकायदा शाखेचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, या वेळी मंडलाधिकारी दीपक चव्हाण, व्यंकटेश चिरुमुल्ला, किशोर शिंगोटे, गौरी तेलंग, विकास पाटील, सूर्यकांत पाटील, सत्यवान लांडगे व तलाठी उपस्थित होते.
सर्व्हर व्यवस्थित नसल्यामुळे तलाठ्यांची कामाची पेंडन्सी वाढल्याने वरिष्ठ कार्यालयाची भिती तलाठ्यांनी घेतलेली होती. वारंवार वरीष्ठ कार्यालयास याबाबत निवेदन दिलेले आहे. करोना, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तलाठ्यांनी डीएससी जमा करण्याबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे.
– ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना.
मागील एक महिन्यापासून मावळात सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संगणकीय कामे होत नाहीत. नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांना नवीन सात-बारा हवा असतो. मात्र तो मिळत नाही. याशिवाय सातबाराच्या नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हरला स्पीड मिळत नसल्यामुळे डीएससी मशिल जमा केलेल्या आहेत.
– सखाराम दगडे, अध्यक्ष, तलाठी संघटना, मावळ.