Dhule News : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका लग्न समारंभात झालेल्या वादातून तीन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लग्नपत्रिकेत नाव का टाकले नाही आणि समाजात वर्चस्व कोणाचे, या अत्यंत किरकोळ कारणावरून हे हत्याकांड घडले. गुरुवारी दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना पिंपळनेर आणि गुजरातच्या सोनगड येथील दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या वादात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. यात सोनू गोसावी आणि देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर साई गोसावी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या पत्रिकेत सोनगड येथील काही व्यक्तींची नावे वगळण्यात आली होती. यावरून काही महिन्यांपूर्वीही वाद झाला होता. त्याचेच पर्यावसान कालच्या रक्तरंजित संघर्षात झाले. पिंपळनेर पोलिसांनी याप्रकरणी सोनगड येथील दोन मुख्य संशयित, एक वाहनचालक आणि अन्य एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिंपळनेर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.