ढोला मारू… राजस्थानी मनाला आंदोलीत करणारी प्रेम कथा… यास राजस्थानचे राजकाव्य म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या काव्यात राजस्थानी संस्कृती आणि जीवनशैलीचे अत्यंत परिणामकारक व सजीव असे चित्रण रेखटण्यात आलेले आहे. राजस्थान, मालवा तसेच उत्तर भारतात आजही हे काव्य सुरसतेने गायिले जाते. हे काव्य वर्षा ऋतूत ढोलक आणि मंजिरा या वाद्याच्या साहाय्याने प्रस्तुत करण्याचा प्रघात आहे. हे प्रस्तुत करणाऱ्याला “दुलैय्या’ असे संबोधले जाते. “दुलैय्या’ चिकारा वाजवून गातो व “सुरैय्या’ अधूनमधून त्याची री ओढतो. नलराजा हे कच्छवाह राजपूत होते असे कच्छवाह बखर सांगते. या कथेचे चार रूपांतर असल्याचे समजते. पहिल्यात केवळ दोहे आहेत, तर दुसऱ्या कथेत गच्छ कवी कुशललाभ रचित चौपाई आहेत. खरं तर यांनीच या छिन्न भिन्न कथासूत्राची साचेबद्ध मांडणी केली. तिसऱ्या रूपांतरात गद्य तर चौथ्यात या तिन्हींचा समावेश आहे.
“ढोला-मारू’ राजस्थानातील जनमानसाचे प्रीतिकाव्य…दहाव्या शतकात घडलेली ही प्रेम कथा आजही आपले गारूड राखून आहे. त्याचं झालं असं की, राज्यात दुष्काळ पडल्याने पुगल देशाचा राजा, पिंगल याने नरवरगढच्या नलराजाकडे आपला मुक्काम हलविला. तेथील वास्तव्यात पिंगलराजाच्या पत्नीस नलराजाचा पुत्र “ढोला’ (मूळ नाव, साल्हकुमार) आपली कन्या मारू (मूळ नाव, मारवणी)साठी पसंत पडला. राणीच्या आग्रहाखातर पिंगलराजाने या दोघांचा लग्न लावून देण्यासंबंधीचा प्रस्ताव नलराजा समोर ठेवला. नलराजालाही यात काही वावगं वाटलं नाही आणि सर्वसंमतीने बाल्यावस्थेतच त्या दोघांचे लग्न लावून देण्यात आले. कालांतराने राज्याची परिस्थिती सुधारली आणि पिंगलराजा पत्नी व मारूला घेऊन मायदेशी परतला.
पुढे बराच काळ लोटला आणि तिकडे “ढोला’ तर इकडे “मारू’ युवावस्थेस प्राप्त झाले. यथावकाशाने पिंगलराजाने मारूला नांदवायला घेऊन जा, असे आवतण नलराजास पाठविले. तर तिकडे नलराजा मात्र या दोघांचे लग्न हा भातुकलीचा खेळ समजून विसरूनही गेला होता. किंबहुना हे आवतण येण्याआधीच त्याने ढोलाचे लग्न मालवाची राजकन्या मालवणी बरोबर लावून टाकलं होतं. ढोलाचे आधी लग्न झाले असल्याचे मालवणीला माहीत होते. सवतीचा डाह म्हणून स्वतःचा अधिकार वापरत तिने पिंगलराजाचे हे आवतण नलराजापर्यंत पोहचू दिले नाही.
इकडे मारू ढोलाची वाट पाहून थकली. तिला पतिविरह असह्य होऊ लागला. त्यात ढोलाने लग्न केल्याचे कळाल्यावर तर ती कोसळलीच. मुलीची अवस्था बघत अस्वस्थ झालेल्या पिंगलराजाने एक शक्कल लढविली. त्याने “ढांढी’ जमातीच्या गायक समूहास नरवर देशी जाऊन मारूच्या वेदना, आख्यान माध्यमाने ढोलापर्यंत पोहचविण्यास सांगितले. “ढांढी’ लोकांनी आपले काम चोख बजावले आणि त्यांनी ढोलाला त्यांच्या बाल्यावस्थातील लग्न, मारूचे त्याग व प्रेमाची आठवण करून दिली. ढोलाला आपली चूक उमगली, तो व्यथित झाला. मालवणी व इतर कोणालाही न सांगता तो रातोरात मारूला भेटण्यास पुगलदेशी पोहोचला. ढोलाला पाहताच मारूचे प्रेम उफाळून आले. तिच्या हर्षाला पारावर उरला नाही. ढोलाने काही काळ तेथे वास्तव्य केले आणि मग मारूला घेत आपल्या देशाकडे कूच केले.
या प्रवासात एक आक्रीत घडले. एका मजलेवर सर्पाने दंश केल्यामुळे मारूवर मृत्यू ओढावला. अकस्मात झालेल्या या दुर्घटनेने ढोला विलाप करू लागला. त्यानेही मारू मागे देहत्याग करण्याचे ठरविले. इतक्यात एका योगी पुरुषाचे तेथे आगमन झाले. त्याने आपल्या योगशक्तीने अभिमंत्रित जल शिंपडून मारूला पुनर्जीवित केले. त्या योगी पुरुषाचे आभार मानत ती दोघं पुढं निघाली; पण संकटाची मालिका येथे थांबली नाही. थोड्या पुढे जैसलमेरचा राजकुमार उमरासुमरने त्यांची वाट अडविली. उमरासुमर पूर्वीपासूनच मारूवर आसक्त होता. मारूलाही हे माहीत होते; पण तिला तो कधीच आवडला नाही. ती सराईत उंटस्वार होती, तिने थांबत असल्याचे आव आणत आपल्या उंटाला जोरदार छडी लगावली, त्या उंटाने चौखुर उधळत पळ काढला. हे सारे निमिषार्धात घडले, कोणाला काही कळायच्या आधीच ढोला-मारू सर्वांच्या दृष्टी आड झाले. असे अनेक अडथळे पार करत ती दोघं नरवरगढला पोहोचले. तेथे त्यांचे जंगी स्वागत झाले. एव्हाना मालवणीचाही रोष मावळला होता. पुढे ढोला दोन्ही पत्नीसोबत सुखनैव राहत, राज्य कारभार करू लागला.
सत्येंद्र राठी