पिंपरी | धरण उशाला, कोरड घशाला ; चावसर गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण

पवन मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील चावसर ग्रामपंचायतीच्या नियोजनशुन्य कारभारामुळे गावातील जलजीवन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत महिला आणि ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे.
चावसर गावात मागील ६ महिन्यांपासून पाण्याची प्रचंड गैरसोय झाली असून ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर पावसाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. तर महिला वर्गाला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
एकीकडे गावच्या उशाला असलेले पवना धरण १०० टक्के भरलेले असताना दुसरीकडे धरणाच्या काठावर असलेल्या चावसर गावातील ग्रामस्थांना मात्र पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाहीये. अखेर गुरुवारी ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी पंचायत समिती कार्यालय वडगाव मावळ येथे आंदोलन केले.
यावेळी महिलांनी आक्रोश करत आपले गाऱ्हाणे मांडले. तसेच ग्रामस्थांशी असभ्य भाषेत बोलणाऱ्या ग्रामसेवकावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सरपंचांचे महावितरणकडे बोट
याबाबत माजी सरपंच नवनाथ कुडले यांना विचारले असता ते म्हणाले, पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. पुर्वीच्या ठेकेदाराने कामात दिरंगाई केल्याने याठिकाणी दुसरा ठेकेदार देऊन काम करुन घेतले आहे. परंतु पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक वीज पुरवठा होत नसल्याने वारंवार मोटार बंद पडत आहे.
याठिकाणी वीज रोहित्रांची क्षमता कमी असल्याने अडचणी येत आहेत. महावितरण कार्यालयाकडे क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव दिला असून याबाबत अद्याप महावितरणकडून कार्यवाही झालेली नाही.
महावितरण कार्यालयाकडे या प्रश्नाचा पाठपुरावा केला असता, कार्यालयात पत्र दिल्याचे शाखाधिकारी जाधव यांनी सांगितले.
तसेच पाणीपुरवठा योजनेत ट्रान्सफॉर्मरसाठी निधीची तरतूद नसल्याने त्वरित याबाबत निर्णय शक्य नसल्याचे देखील सांगितले. आमदार सुनील शेळके यांनी देखील या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच तेथील जलजीवन योजनेचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.
सहा महिने झाले, गावात पाणी येत नाही. ग्रामसेवकांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा ग्रामसेवक या गोष्टीची दखल घेत नाही. गेली दोन महिने झाले ग्रामस्थ फोन करत आहे. तरी योग्य प्रतिसाद न देता ते सातत्याने मोबाईल बंद करून ठेवत आहेत.
धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आमची अवस्था झाली आहे. आम्ही नक्की कुणाकडे दाद मागावी. या ग्रामसेवकाला त्वरित निलंबित करा, असा अधिकारी आम्हाला नको. – मारुती मोहन गोणते, ग्रामस्थ
एक तर आमच्या जागा धरणात गेल्यात. मग सरकारने आमच्याकडे लक्ष नको का द्यायला? आमच्या गावात पुढारी फक्त मत मागायला येतात. यावेळी मत मागायला येवूद्या, कुणीही यंदा मतदान करणार नाही. – लक्ष्मीबाई गोणते, ग्रामस्थ, चावसर
पंप हाऊसमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे. येत्या दोन तीन दिवसात पंप हाऊसचे काम पूर्ण होईल आणि पाणी पुरवठा पूर्ववत होईल. – संतोष बोंद्रे, ग्रामसेवक, चावसर – केवरे


