पाचगणी – ढोंगी “मन की बात’ करणाऱ्यांनी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणला आहे. देश शक्तीशाली बनण्यासाठी सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही. विकेंद्रीकरणातून सत्ता सामान्यांच्या हाती येत नाही तोपर्यंत खरी लोकशाही येणार नसून हुकूमशाही उलथवून “आपलं सरकार’ आणण्यासाठी जागृत रहावे, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उदयनराजे बोलत होते. यावेळी विठ्ठल बगाडे, विकास शिंदे, रॉबर्ट मोझेस, उपाध्यक्षा सुलभा लोखंडे, विराज शिंदे, पालिका सदस्य नारायण बिरामणे, दिलावर बागवान, उज्वला महाडिक, अनिल वनने, अपर्णा कासुर्डे, सचिन भिलारे, आशा बगाडे, विजय भिलारे, विविध गावाचे नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्याचे प्रश्न व समस्याही अडचणीच्या आहेत. लोकसंख्या वाढली पण येथे आतापर्यंत बांधकामाचे क्षेत्रफळ वाढले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी वास्तव्यासाठी अनधिकृत बांधकामे केली ही त्यांची चूक आहे का? वृक्षतोड होऊ नये ही येथील भूमीपुत्रांची भावना आहे. एफएसआय वाढ करणे, व्याग्रह प्रकल्प, एको सेन्सिटिव्ह झोन, बफर झोन हे प्रश्न सुटणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विठ्ठल बगाडे यांनी मनोगत व्यक्त केले. जगन्नाथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दिलावर बागवान यांनी आभार मानले.