नजर हटी दुर्घटना घटी! चालकाला डुलकी लागल्याने यवतमाळमध्ये भीषण अपघात

यवतमाळ : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. आपली एक चूक अनेकांच्या जीवावर बेतू शकते. याचा प्रत्यय यवतमाळमध्ये झालेल्या अपघातात आला आहे. यामध्ये कारचालकाला डुलकी लागल्याने भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके?
अहमदनगर येथून टोयोटा चार चाकी वाहनाने आठ प्रवासी प्रवास करत होते, ते वाशीम मार्गे पुसदकडे येत असताना चालकाला अचानक झोप लागल्याने हे चारचाकी वाहन सागाच्या झाडावर आदळून भीषण अपघात झाला. हे भाविक अहमदनगर येथून माहूरला रेणुका मातचे दर्शन घेऊन पुन्हा अहमदनगरकडे जात होते. ही घटना पहाटे 6 वाजताच्या सुमारास घडली.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. खंडाळा पोलीस देखील अपघातस्थळी दाखल झाले, यानंतर अपघातग्रस्तांना स्थानिकांच्या मदतीनं वाशीम आणी पुसद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेले नाहीत.





