मुंबई : महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येने अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर आढळल्याचा दावा करणाऱ्या महायुती सरकारला आता विरोधकांनी धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घुसखोरांची नेमकी आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी रविवारी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनामा प्रकाशनावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसने सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि जुन्या आश्वासनांवरून बोचरी टीका केली आहे. मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईला बांगलादेशी आणि रोहिंग्यामुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे, अशा घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी आयआयटीच्या मदतीने एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान विकसित करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावर पलटवार करताना सचिन सावंत म्हणाले की, जर सरकारने खरोखरच देशात सर्वाधिक घुसखोर महाराष्ट्रात असल्याचे ओळखले असेल, तर त्यांची संख्या जनतेसमोर मांडायला हवी. केवळ निवडणुकीच्या तोंडावर अशी विधाने करून जनतेची दिशाभूल करू नये. मुख्यमंत्री नेहमी भविष्यातील स्वप्ने रंगवतात. मात्र वर्तमान काळातील भीषण वास्तवाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती केवळ आगामी योजनांवर आधारित असतात. परंतु जुन्या आश्वासनांचे काय झाले यावर ते कधीही भाष्य करत नाहीत. २०१७ पर्यंत इस्टर्न फ्री-वे ठाण्याला जोडण्याचे आणि मुंबई पूरमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ही दोन्ही कामे आजही अपूर्ण आहेत. सरकारच्या कामकाजात केवळ तारीख पे तारीख देण्याचा प्रकार सुरू असल्याची टीकासावंत यांनी केली.