Devendra Fadnavis on Thackeray । महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकारण चांगलंच तापलंय. या मुलाखतीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असे म्हटले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांना ‘कोडगा माणूस’ असे म्हटले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिलाय.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? Devendra Fadnavis on Thackeray ।
उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात त्यांनी लिहिले, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही.” असे म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी,“हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत. दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका. जशास तसे उत्तर दिले जाईल!”, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले.
देवेंद्र फडणवीसांचा पलटवार Devendra Fadnavis on Thackeray ।
उद्धव ठाकरेंच्या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अमरावतीतून उत्तर दिले. “एकदा खोटं बोललं की वारंवार खोटं बोलायला लागतं. मग कुठेतरी पोल-खोल होते. आज उद्धव ठाकरेंची पोलखोल झाली. माझे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीमध्ये जाईन. त्यांना वेड लागले असेल. पण मला तर वेड लागलेले नाही”, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.