Devendra Fadnavis On Sharad Pawar: शरद पवारांनी आज कोल्हापुरातून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी, सत्ताधारी पक्षाला ईव्हीएमवरुन टोला लगावत काही आकडेवारी मांडली. पण, ईव्हीएमवर आत्ताच बोलणं हे योग्य नसल्याचं ते म्हणाले. त्यानंतर, मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं. तसेच, पवार साहेब तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे. आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?, असा प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही आकड्यांची जुळवणी करत शरद पवारांवर पलटवार केला.
चला 2024 च्या लोकसभेत काय झाले ते पाहू, असे म्हणत त्यांनी आकडेवारी दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेली मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13 आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा मिळाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
श्री शरद पवार साहेब, @PawarSpeaks
आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?
चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू,
भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.
शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2024
2019 च्या लोकसभेचीही दिली आकडेवारी –
2019 च्या लोकसभा निवडणुकांचं उदाहरण तर फारच बोलकं आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल!, असे फडणवीस म्हणाले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले ?
महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर उत्साहाचं वातावरण असतं. मला महाराष्ट्रात तसं वातावरण दिसत नाही. पण उगीच आरोप करणं योग्य नाही. कारण माझ्याकडे पुरावा नाही. प्रत्येक राजकीय पक्षांना एकंदरीत मतं किती पडली आणि लोक किती निवडून आले याची आकडेवारी काढली. काँग्रेसला राज्यात 80 लाख मते आहेत. आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना 79 लाख मते मिळाली. काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडली. त्यांचे 57 लोक निवडून आले. म्हणजे 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57. शरद पवार गटाचे 72 लाख मते आहेत. आमचे उमेदवार निवडून आले 10. अजित पवार गटाचे 58 लाख मते आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले 41. 72 लाखांचे 10 आणि 58 लाखवाल्यांचे 41. हे काही तरी आहे. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
विशेष अधिवेशन आजपासून सुरू –
राज्यातील फडणवीस सरकारचं पहिल विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं असून पहिल्याच दिवशी ईव्हीएमच्या (EVM) मुद्दयावरुन विरोधकांनी विधानसभा परिसरात गोंधळ घातला. तर, महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी शपथविधीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं फोनवर बोलणं झाल्यानंतर या आमदारांनी शपथ घेण्याचा निर्णय घेतला आहे.