मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात. या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या पोर्टलवरील सर्व नागरी सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात, तसेच सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्यादृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील नागरिक सेवांसंदर्भात आढावा बैठक घेतली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येक तालुक्यात सुरुवातीला १० ते १२ गावांचा एक समूह तयार करावा जिथे स्थानिक गरजांनुसार सेवा पुरविल्या जाऊ शकतात आणि समर्पित पथकांनी वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी या समूहांचे व्यवस्थापन करावे. सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्यात यावी, तसेच अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करावे. सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल, या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. तसेच सेवा पुरवण्यासाठी डिश डिजिटल सेवा हबचा वापर करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले. तसेच अर्ज प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्याचे आणि तृतीय-पक्ष संस्थांनी सेवांच्या गुणवत्तेचे स्वतंत्रपणे ऑडिट करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात 1001 सेवा पुरवण्याचे काम सुरू असून त्या पैकी ९९७ सर्व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये २३६ सेवांची वाढ झाली आहे.