Chhagan Bhujbal । Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडिअम किंवा राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजपचे आमदार मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकल्या असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर बाजी मारली आहे. महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता कोणत्या गटाला सर्वाधिक मंत्रिपदं मिळणार याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. अश्यातच आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी यावर भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला गेलो होता, तो दूर करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी केले. तसेच महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा वाटा मोठा आहे. लाडक्या बहिणांना सरकारने वेळेवर पैसे दिले. यामुळे लाडक्या बहिणांना खात्री पटली. पर्यायाने जनतेने मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकला. यावेळी महिलांचे मतदान इतर निवडणुकीपेक्षा जास्त झाले. ज्या वेळी महिला मतदान करतात त्यावेळी त्या घरातील पुरुषही तेच मतदान करतात, हे सूत्र आहे. त्याचा फायदा झाला. ते पुढे म्हणाले, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही अजित पवार यांची निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि भाजपचे नेते कोण ते आता निश्चित होणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. आता राज्यपाल आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवतील. त्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदाचे वाटप होईल, असे भुजबळ म्हणाले.