Devendra Fadnavis । Manoj Jarange | Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचा वाद आता न्यायालयात पोहोचला असून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांने कोर्टात केला आहे. यावेळी हायकोर्टाने काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले असून मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबईत संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत, त्यांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आल्याचं न्यायमूर्तींकडून स्वतः सांगण्यात आलं. तसेच, मुंबईत अजून आंदोलनकर्ते येत आहेत, त्यांना कसं अडवणार अशी विचारणाही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. न्यायालयाने आजच्या सुनावणी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं. दरम्यान, सुनावणीदरम्यान हायकोर्टाच्या बाहेर मराठा आंदोलक अनेक ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळालं. आता न्यायायाच्या या निर्देशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी प्रवासात होतो. न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते मी पाहिलेले नाही. पण मला समजल्यानुसार मनोज जरांगे यांना उपोषणाला जी परवानगी देण्यात आली होती, त्याला काही अटी-शर्ती होत्या. या अटींचे उल्लंघन झालेले आहे. विशेषत: रस्त्यावर ज्या गोष्टी चालू आहेत, त्यावर न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे हे निर्देश पालन करणे हे सरकारला क्रमप्राप्त आहे. त्या निर्देशांचे सरकार पालन करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच पुढे बोलताना बैठकीत आम्ही या आंदोलनावर काही तोडगा काढण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा शोध घेतला जात आहे. काही मार्ग काढता येतील का? मार्ग काढता तो तो न्यायालयात टिकेल का? यावर चर्चा झाली. न्यायालयात टिकणारा कायदेशीर मार्ग काढण्याची आमचा प्रयत्न आहे. जरांगे यांच्या आंदोलनात मुंबईत काही महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन करण्यात आले. यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकारांवर अशा प्रकारचा हल्ला करणे तसेच महिला पत्रकारांचा विनयभंग हे गालबोट लावण्यासारखे आहे. आपण याआधी 30 पेक्षा अधिक मराठा मोर्चे पाहिलेले आहेत. या मोर्चांची शिस्त आपण पाहिलेली आहे. या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेने घेतलेले निर्णयही आपण पाहिलेले आहेत. महिला पत्रकार किंवा पत्रकार हे त्यांचे काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले होणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. याचा सर्व स्तरावर निषेध झालाच पाहिजे, असे थेट मत फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच आम्ही जमेल त्या मार्गाने चर्चा करत आहोत. सरकारला आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. सरकार कुठलाही इगो धरत नाहीये. आम्ही मार्ग काढत आहोत. समोरून चर्चेला कोणी आले तर तोडगा लवकर निघेल, असेही पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले.