मुंबईः ठाकरे सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांना मोठा दिलासा देत मदतीची घोषणा केली होती, आता त्याच मदतीवरून भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. वसुली आली की सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
या सरकारमध्ये चाललेय तरी काय? विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय. मार्च ते मे 2021 मध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा 5.10 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1.74 लाख, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 39 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख रुपये फक्त मदतीची घोषणा केली.
नागपूर विभागातील 6 जिल्हे मिळून फक्त 10 कोटी रुपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व 5 जिल्हे मिळून फक्त 1 लाख रुपये! म्हणजे एक जिल्हा फक्त 20 हजार रुपये, अशी जुलै 2021च्या मदतीची घोषणा करण्यात आली होती. शेतकर्यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय?, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय.
या सरकारमध्ये चाललेय तरी काय ❓
विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्यांना मदतीची प्रतिक्षा आहे…
वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकर्यांना मदत म्हटली की, ‘कासव’ ❗️ (1/5)— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) October 8, 2021
गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे 2021 या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निधीचे वितरण करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. याकरिता 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
दुसरीकडे पावसाच्या लहरीपणाचा सामना राज्यातील शेतकऱ्यांना करावा लागलाय. केवळ खरीपातीलच नाही तर मार्च, एप्रिल व मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले होते. गत महिन्यात झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे सुरूच आहेत.
मार्च, एप्रिल व मेदरम्यान झालेल्या नुकसानभरपाईसाठी 122 कोटी 26 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून, तो वितरीत करण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.