रत्नागिरी – उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. सोलगावमध्ये पोहचल्यानंतर रिफायनरीला विरोध करणाऱ्या नागरिकांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. तसेच लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. ग्रामस्थांकडून यावेळी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे म्हणाले की, “रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आहे. मात्र मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. हुकूमशाहीचा विचार केला तर हुकूमशाही मोडून काढू. रिफायनरी प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जा. जे वादग्रस्त प्रकल्प नाहीत ते गुजरातला आणि बाकीचे इकडे. राख आम्हला आणि रांगोळी तुम्हाला हे चालणार नाही.” पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. ” मन की बात करायला आलो नाही, जन की बात ऐकायला आलो आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. “रिफायनरी प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जा. जे वादग्रस्त प्रकल्प नाहीत ते गुजरातला आणि बाकीचे इकडे, राख आम्हला आणि रांगोळी तुम्हाला हे चालणार नाही. जनतेचे हाल करुन विकास होत असेल तर तसा विकास मी होऊ देणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी सरकारवर दिला. “माझी कोकणी माणसं मूर्ख नाहीत की चांगल्या गोष्टीला विरोध करतील. जिद्द कायम ठेवा शिवसेना तुमच्यासोबत आहे”, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी ग्रामस्थांना दिला.