Laxman Hake: जरांगेंचा रखरखत्या उन्हात उपोषणाचा निर्धार; लक्ष्मण हाके म्हणाले “जीवाची काळजी घ्यावी”
Laxman Hake: 'मनोज जरांगेंची मागणी बेकायदेशीर, हाल्याचं दुध काढण्याचा हा प्रकार आहे'

Laxman Hake: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाविषयीच्या अनेक मागण्या गेल्या 10 महिन्यांपासून प्रलंबित असल्याने त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
आता त्यांनी येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. उन्हाचा फटका बसून जर काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असे जरांगे म्हणाले.
आज त्यांनी माध्यमांशी बोलताना उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं, सरकारला गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिला होता, त्या काळात सातारा गॅझेटिअरवर जीआर काढला गेला नाही. आता मी उन्हात आमरण उपोषणाला बसणार असून मेलो तरी चालेल, असं मनोज जरांगे म्हणाले. यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया देत मनोज जरांगेंवर निशाणा साधला.
“मनोज जरांगेंची मागणी बेकायदेशीर आहे. हाल्याचं दुध काढण्याचा हा प्रकार आहे. पण सरकार मात्र राजकारण करण्यात व्यस्त आहे. मनोज जरांगे यांना अर्धा टक्के बजेटमध्ये अख्खा मराठा समाज आणून अर्धा टक्के बजेट शिफ्ट करून घ्यायचा आहे का? मनोज जरांगे यांची मागणी संविधानाला धरून नाही, जर त्यांची मागणी मान्य झाल्याने ओबीसीचं झोपडं मात्र पूर्णपणे उध्वस्त होणार आहे,” असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, “जे वारंवार दावा करत आहेत की लेकरा बाळांवर अन्याय झाला, गरिबी आली आणि मराठ्यांचं पाच पिढ्याचं खाल्लं आहे. हे जे काय दावा करतात ते ओबीसींनी काय खाल्लं, ओबीसींना काय मिळालं, याचं एकदा एनालिसिस महाराष्ट्र सरकारने केले पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या या पुरोगामी बजेट पैकी अर्धा टक्क्याच्या पुढे ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी कधी महाराष्ट्र शासन बजेट आणि तरतूद करू शकले नाही.”
“ओबीसीचे आरक्षण संपवणे, हे महाराष्ट्रात षडयंत्र आहे, हा कुटील डाव आहे, खरं कोणीही बोलायला तयार नाही, वास्तव कोणीही बोलायला तयार नाही, संविधानाची भूमिका मांडायला कोणी तयार नाही, ओबीसींचं काय म्हणणं आहे. त्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. ओबीसींचं काही नुकसान होत आहे, हे पाहण्यात कोणालाही रस नाही”, असेही हाके म्हणाले.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांनी हे आंदोलन रखरखत्या उन्हात करू नये, आणि त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, असा सल्लाही दिला.
हेही वाचा:






